Showing posts with label मनातलं. Show all posts
Showing posts with label मनातलं. Show all posts

Thursday, 2 October 2025

संधी इथेच आहे !

निर्यात म्हणजे तसं पाहता काय असतं वेगळं ? इथे जवळ काही वस्तू पाठवायच्या ऐवजी लांब पाठवायची. लहान गोष्टी पाठवताना तर ही कटकटच वाटते,नाही का ? 

उदा. कुणी खाद्य पदार्थ तयार करतय तर लांब  म्हटलं की जरा जीवावरच येतं. 

इतकं आणि इतकंच साधं ठेवलं ना आपण, म्हणजे त्या so called "export" चा गरिमा काढून टाकला की मग आपण प्रत्यक्ष, सहज विचार करू लागतो, त्याला प्रवृत्त होतो.

उदा. नुकताच मी मध्यपूर्वेच्या देशांत जाऊन आलो. काही काम मिळाले होते. तर पाठोपाठ, सवयीने तिथेच पुढे काय संधी त्याकरता पुन्हा एक प्रदर्शन असेल त्याला जावे का, वगैरे महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात मन गुंतू लागलं. 


तरी पुढची कोणतीही पावले उचलण्या पूर्वी काही गोष्टी विचारत घेणे योग्य, जसे की 

जे काम तिकडे निर्यात करू पाहतोय,त्याला इथेच खूप मागणी आहे ना !
कधी तरी येणाऱ्या spikes वर संपूर्ण रणनीती आखणे पूर्ण चूक
तिथेही ( आखाती देशांत ) त्यांना scale up करणे ही मोठी समस्या भेडसावते, जी आपल्याकडे अजिबात नाहीये.
मान्य की आपल्याकडे जरा गोंधळ आहेत, पण त्यातच अमाप संधीही आहेत.

सरतेशेवटी एवढेच म्हणायचे आहे,की इथेच आपल्याला आपले काम देऊ करण्यासाठी वाव असेल, तर परदेशी काम करू नये असे नाही, पण वाट पहावी, रणनीती आपल्याच करता आखावी. 

सध्याच्या अमेरिकी आयातशुल्क प्रकरणाने अनेक दिग्गज मंडळींना जागेवर आणले असेलच !

Friday, 5 September 2025

GST शिथिलीकरण : एक धोरणात्मक पाऊल

आपले धोरण म्हणून जेव्हा काही कृती आपण करत जातो, तेव्हा आपोआपच येणाऱ्या संधीना सामोरे जाताना ताण न येता त्या हाताळल्या जातात. धोरणात्मक विकास, आपल्या व्यवसायाचा देखील, हा पायरी पायरीने होत जातो, आणि आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचत जातो, आणि हे सर्व अतिरिक्त ताण न येता होऊ लागतं.

नुकताच झालेला GST मधील बदल सुद्धा ह्याच परिप्येक्षातून पाहता येईल."आत्मनिर्भर भारत" ही भारताची अगदी प्रथमपासूनच भूमिका राहिली आहे. पूर्वीपासून ह्याच संकल्पनेचा नक्कीच आधार घेऊन ह्याकडे वाटचाल सुरू होती. त्यामुळेच २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या GST मध्ये काळानुरूप सुधारणा व सुसूत्रीकरण होणारच. गेल्या वर्षापासूनच अंतर्गत मागणी कमी होणे ही समस्या आपली अर्थव्यवस्था फेस करतच होती. त्यात अमेरिकेच्या तात्पुरत्या का होईना पण एकतर्फी आयात शुल्क प्रकरणामुळे ह्यात काहीतरी करणे भाग होते. गेल्या काही तिमाही ( ट्रम्प प्रकरणाच्या पूर्वी पासून ) सततचा कमी होणारा रेपो दर, MSME ना प्रेरक अशा कर्ज मोहिमा हेच सूचित करत आहेत. अमेरिकी नियमाने ह्याला एक निश्चित पाऊल, लगेच घ्यायला उद्युक्त केले.

पण आपण हे आधीपासूनच करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. कदाचित आपल्या देशाची वाढू लागलेली आर्थिक आणि एकंदरीत ताकद पाहून ट्रम्प महाशय व्यथित झाले आणि काहीतरी कारण काढून ह्या प्रति अमेरिका होऊ पाहणाऱ्या समीकरणांना आळा घालण्यासाठी त्यांनी फक्त भारतावर कडक निर्बंध लागू केलेत. 

आपल्या सरकारने चीन प्रमाणे कोणतीही आततायी कृती न करता, एक सुरक्षित अंतर ठेवून प्रतिसाद दिलाय. आणि आत्मनिर्भरते कडे अधिक जोमाने, आणि विश्वासाने आगेकूच सुरू केली आहे, आणि आपण हे सर्व करायला आधीपासून तयार आहोत. 

सोपे नसले,तरी अवघड नक्कीच नाही. आपल्या भारत देशाच्या आता पर्यंत असणाऱ्या सर्व नेत्यांचं असलेलं सामाजिक भान ह्याला ह्याचं सर्व श्रेय जातं. मुळात तीनशे चारशे वर्षा पूर्वी अस्तित्वात आलेल्या देशाची उथळ विचारसरणी विरुद्ध १.५ ते दोन हजार वर्षे नक्की इतिहास ठावूक असलेल्या एका उपखंडाची संस्कृती ही सर्व आव्हाने हाताळायला सज्ज आहेच.

हे सर्व वृथा अभिमान म्हणून प्रतिपादित होत नाहीये, पण वृथा भीती सुद्धा नको. आहोत आपण समर्थ, घेऊ सांभाळून !

Tuesday, 26 August 2025

स्वधर्माचे महत्त्व

सरकारने पैसे लावून ऑनलाईन गेमिंग व्यवसायावर बंदी आणली आहे. परिणामस्वरूपी ७० हजार डॉलर ची dream eleven नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. बायजू तसेच सहारा इंडिया ह्यांसारख्या कंपन्यांनी प्रत्यक्ष उत्पादने भक्कम करण्या ऐवजी अल्पावधीत लोकप्रिय होत चाललेल्या टी 20 क्रिकेट करिता BCCI ला प्रायोजक राहून मोठा ग्राहकवर्ग ओढला. मुळात ह्या कंपनीचे व्यवसाय प्रारूप काय तर ग्राहकाला नादाला लावणे. हे कधीतरी गोत्यात येणारच होते. आले. इतकेच. 

थोड्याफार फरकाने युट्यूबर किंवा इंस्टाग्राम वरून कंटेंट क्रिएटर्स हा जो एक नव उद्योग म्हणून उदयास येतोय, त्याचीही वेगळी कथा नाही. आपले मूळ काम काय, आणि आपण काय प्रकारचं साहित्य निर्माण करत आहोत ह्याचं भान ह्या मंडळींना कधीच अस्वस्थ करत नाही. कारण त्यातून मिळणाऱ्या ( किंवा भासमान ) आर्थलाभाला दिलेले निव्वळ महत्त्व. माझ्या समोर दोन उदाहरणे आहेत :- 

एक आमचा कुटुंबाचा मित्र ज्याचे कला शाखेतील सर्वोच्च विद्यालयात शिक्षण झाले आहे, आणि त्याला त्यात खूप उत्कृष्ट असे प्रावीण्य लाभले आहे. ज्याने हा मार्ग स्वीकारला आहे,आणि तो आज खूपच जास्त पैसे मिळवीत आहे,आणि राहिलही. तो जो काही आशय पोस्ट करत असतो,त्याचा आणि त्याच्या मूळ प्रावीण्य असलेल्या विषयाशी काहीच संबंध सापडत नाही. बर जो आशय तो पोस्ट करतो,त्यानेही प्रेक्षक वर्गाच्या आयुष्यात काही गुणात्मक बदल घडत असेल असे वाटत नाही.

दुसरे उदाहरण माझे स्वतः चेच. अनेक वर्षे माझ्या water बिझनेस बद्दल मी व्हिडिओज करत आहे. Youtube वर पोस्ट देखील करत आहे. बऱ्यापैकी subscriber आहेत. सोबत इंस्टाग्राम वर सुद्धा मी हल्ली हल्लीच काही कंटेंट पोस्ट केला आहे. काही पाण्याविषयक मूलभूत संकल्पना समजावून सांगण्यासाठी. अचानक एका व्हिडिओ ला प्रमाणाबाहेर लोकप्रियता मिळाली. ह्याचे कारण काहीच नाहीये. तर ह्याच्या नादाला लागून मी व्यावसायिक आणि अधिक असेच व्हिडिओ तयार करणे, दर आठवड्याला दोन व्हिडीओ टाकणं वगैरे म्हणजे परत मूळ उद्देशापासून फारकत. मुळात आठवड्याला दोन असे काही असायला तर हवं. त्यामुळे ह्या नादाला मी फार लागत नाहीये.

फरक आहे तो स्वधर्म निवडायचा

स्वधर्म म्हणजे सहज धर्म. माझे व्यावसायिक काम काय ? तर लोकांनी व्यवसायात, (त्यात water business हा एक), येणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देताना सतत आर्थिक फलकाकडे लक्ष ठेवून मार्गक्रमण करावे ह्या करिता नियमित काळाने त्यांच्यासोबत केलेले त्रयस्थ अवलोकन व सुधारणा. 

माझ्या स्वतः बाबतच मी हे करत आलोय, हे माझे qualification. हा सहज होणारा धर्म. स्वधर्म. 

ह्याचे स्मरण, भान ठेवले तर माझ्याकडून इतर कृती होणारच नाही. ती मिळणाऱ्या संपत्ती किंवा लोकमान्यते पेक्षाही जास्त महत्त्वाची आहे, कारण हे काम मी अगदी शारीरिक दृष्ट्या पूर्ण हतबल होई पर्यंत निश्चित, सहज करू शकतो.

तर व्यापक प्रमाणावर पाहता तर ह्या कंपनीचे उच्च उद्दिष्ट नाही की ज्या कामाबद्दल काहीही अभिमान असावा. त्यामुळे स्वधर्माचा पत्ताच नाही. स्पिरिचुअल नाही आहे हे प्रतिपादन. इसमें समझदारी भी हैं 

Friday, 22 August 2025

उत्तम कार्यक्रम कसा असावा...


तारीख २१ ला  महाराष्ट्र bottled water असोसिएशन तर्फे Fssai चे एक प्रशिक्षण ठेवण्यात आलेले होते. त्याबद्दल थोडे ...

मला आधी थोडी शंका होती. कारण असोसिएशन, शिवाय कार्यक्रम विनामूल्य, बालेवाडी संकुलात. एकंदरीत हा जास्त सत्कार सोहळा आणि कमी प्रशिक्षण असा अनुभव असेल ह्याची तयारी ठेवून मी गेलो होतो. अनेक संस्थांचे वार्षिक कार्यक्रम म्हणजे एक निव्वळ टाईमपास असतो नाहीतर. एक लेख ह्या संदर्भात लिहीलाय,वाचा जमल्यास.

परंतु अत्यंत चूक ठरला माझा समज. सत्कार होते, परंतु अगदीच मोजके आणि आवश्यक. प्रायोजकांचे.हे व्हायला हवेतच. ज्यांच्यामुळे हा उत्कृष्ट असा कार्यक्रम अनुभवला. तीन सत्रे तीही अत्यंत परिपूर्ण अशी. Fssai तर्फे त्यांचे प्रमुख अधिकारी मुंबईहून खास आलेले होते. त्यांनी भरपूर ( पुण्याच्या भयंकर ट्रॅफिक मध्येही ) वेळ दिला, अगदी नीट सर्व बदललेले नियम समजावून सांगितले.

उपस्थित मंडळींना ह्याची गरज होतीच,आणि मोठ्या संख्येने संस्थेला प्रतिसाद मिळाला.

चोख व्यवस्था होतीच, त्यात आयोजक मंडळींची आस्था अधिक जाणवली, की प्रत्येक सहभागीला सारे काही व्यवस्थित मिळावे. प्रशिक्षण. 

हे सारे विशेष नमूद करण्याचं कारण असं की हल्ली अनेक संघटनांचे कार्यक्रम अटेंड करतो,त्यात स्वतः चा उदो उदो हा मुख्य अजेंडा असतो. 

नाही म्हणायला काल हे होतं पण ते एकमेकांविषयी वाटणारे प्रेम जास्त होते, उदो उदो कुठेही नव्हता.

शिवाय प्रायोजकांकडून मिळालेली सर्व रक्कम ह्या कार्यक्रमावरच खर्च झाली असणार. कारण जवळपास ५०० तरी लोक असावेत. सर्वांची नाश्त्यासकट जेवण व हाय टी पर्यंत सर्व व्यवस्था, उपस्थितांना प्रशिक्षण विनामूल्य देऊ करणे ही खूप मोठी बाब आहे. ह्यात असोसिएशन स्वतःची तिजोरी लठ्ठ करू पहात नाहीये, हे विशेष.

महाराष्ट्र bottled water असोसिएशन ह्यांचे ह्याबद्दल त्रिवार अभिनंदन.

Monday, 18 August 2025

कठीण काळ समोर : अमेरिकी निर्बंध .....

Whatsapp वरून खूप उथळ मजकूर समोर येतो. नुकताच एक मेसेज आला की कसे आपले पंतप्रधान प्रचंड मुत्सद्दी आहेत, कशा सावध आणि संयमी खेळ्या खेळत आहेत आणि ट्रम्प ह्यांची नाकेबंदी वगैरे करून ठेवली आहे. सोबत अगदि अभ्यासपूर्वक ( तो बेतलेली तत्वेच गन्डलेली आहेत ) प्रतिपादन केलेले आहे, घटनांचे. 

"Whatsapp मेसेज : कुठे गांभीर्याने घेताय" असं बोलायला ठीक आहे हो, पण ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे गांभीर्याने घ्यायला हवं. जबाबदारीने. प्रतिपक्ष म्हणून नव्हे.

तर पहिलं म्हणजे " हे काय किरकोळ आहे, आपला देश भारी आहे " किंवा "लोकसंख्या आपली ताकद आहे " वगैरे देशप्रेमाच्या स्वस्त संकल्पनांतून बाहेर पडून, प्रथम हे एक गंभीर आर्थिक आव्हान आहे हे स्वीकारायला हवे. कारणे सुद्धा तशीच आहेत.

अमेरिका हा सर्वात जास्त कर्जे घेणारा देश आहे, त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे Saving हे त्यांच्या खरेदी पेक्षा कमी असते, मग हा देश श्रीमंत कसा , असा बाळबोध प्रश्न नक्कीच पडू शकतो. बाळबोध ह्याकरिता म्हणतोय, कि एकंदरीत आपल्याकडे असलेली आर्थिक समज दारिद्र्य रेषेच्याही खाली आहे. आणि म्हणूनच वर दिलेल्या Whatsapp पोस्ट्स सहज, ज्ञान म्हणून खपतात, लोक त्यावरून हिरीरीने भाष्य करतात. 

तर कर्जे ही कशाकरता घेतली जातात हे महत्त्वाचे. आपल्यासारखा देश ही जगण्यासाठी, तरण्यासाठी घेत असतो, तर अमेरिकन नागरिक चैनीच्या गोष्टी, किंवा उपजीविके बाहेरील खरेद्या करण्याकरिता. मुळातच अमेरिकेतील गुंतवणूक ही खूप सुरक्षित आहे, त्यामुळे परदेशीय इथे गुंतवणूक करण्यात उत्सुक असतात. त्यामुळे ही कर्जे अमेरिका रणनीती म्हणून वापरते. स्वत:चे सर्व सुरक्षित ठेवून. त्यामुळे अमेरिकेला नाक वगैरे घासायची वेळ आपण नाहीच आणू शकत.

अमेरिका ज्या देशांकडून आयात करते, त्या देशांत भारत १० व्या स्थानी आहे. आणि आपण असे काहीही निर्यात करत नाही, कि ज्यांना पर्याय उभा राहू शकत नाही. उलट आपल्या काही क्षेत्रांना प्रचंड तडाखा बसू शकतो. पर्यायाने नोकऱ्या वगैरे जातील. 

आपण एकदम तडजोड करणेही शक्य नाही. भारताने इतर राष्ट्रांशी बोलणी सुरु केली आहेत, परंतु इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गोची मात्र झालेली आहे आपली. 

मुळात निकृष्ट दर्जा म्हणून हिणवल्या गेलेल्या चीन वरच आता अमेरिका अवलंबून आहे इतका कायापालट चीन ने साधला. आपल्याला नुसता अभिमान बाळगून नाही चालणार, तर कंबर कसून आपल्या शक्ती स्थळांवर नीती केंद्रित करावी लागेल.

सर्व ठिकाणी काळजी स्वरूप स्थिती असली, तरी भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात जलद आहे सध्याला. निर्बंध २७ तारखेपासून अंमलात आले, की ही इतकी उत्तम ह्यापुढ राहिलच असे नाही. 

अशा वेळी, एक व्यक्ती समूह म्हणून भारतीय उपखंड जो एक मनुष्य ह्या नात्याने ह्या सर्व पश्चिमी देशांपेक्षाही प्रगल्भ आहे ( हा दुराभिमान नाही ). खूप पूर्वापार आपल्याकडे संस्कृती नांदत आहेत. जो काही आततायीपणा केलाय, तो परकीय राजांनी. तर आपण आपला Stock घ्यायची गरज आहे. इतरांकडे न पाहता. दुर्लक्ष नाही म्हणणार मी, पण स्वयं विश्वास वाढवून. 

भारतीयांकडे व्यापारी वृत्ती उत्तम आहेच. सोबतीला इतका प्राचीन वारसा, ज्याचा आधार आपण ह्यापुढे पथदर्शक म्हणून ठेवावा, आणि इतके स्वत:च बलवान व्हायचा संकल्प सोडवा, कि तैवान किंवा कोरिया प्रमाणे जगच आपल्या कडे धावत येईल.

Thursday, 14 August 2025

घर बसल्या पुस्तके खरेदी करताना...

ऑनलाइन पुस्तके मिळत असतील, आणि ती सुद्धा वाट्टेल त्या विषयावर, बाजार न फिरता, अमेझॉन सारख्या वेबसाईट वरून, आणि अनंत ! तर का जावं प्रत्यक्ष दुकानात तरी ? शिवाय हल्ली त्या दुकान वाल्यांनी सुद्धा स्वीकारला आहे हा ट्रेंड आणि बऱ्याच मंडळींनी स्वतः च्या वेबसाइट्स केल्या आहेत आता.

वेळ घालवायचा असेल, छान बीन वाटत असेल, गवाक्ष खरेदी ( window shopping ) करायचे असेल, किंवा चक्क एसी ची हवा खायची असेल तर जावे खुशाल पण उगीच जुने विश्वास कवटाळून मी तरी नाही बसत.

ऐवजी, हल्ली नीट पुस्तके निवडून घ्यायला शिकलोय. सोबत ती वाचताना, अभ्यासपूर्ण असतील, तर काही विशेष गोष्टी सुद्धा अंगीकारल्या आहेत आता. तर पहिलं:- पुस्तके निवडताना :-

त्याच्या reviews वर जाणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण आधी पहा की किती reviews आहेत. निदान ( विषयानुसार ) १०० किंवा २०० तरी हवेत. जसे पुस्तक जास्त खपू लागते, तसे reviews वाढू लागतात. चांगल्या सोबत वाईट सुद्धा. 

तर दुसरे म्हणजे अमेझॉन बऱ्याच वेळा आधी वाईट अभिप्राय दर्शवते. आपण लेटेस्ट प्रमाणे क्रमवारी लावून पाहू शकतो. तर वाईट कशाला म्हटले आहे, ते बऱ्याच वेळा पुस्तकाच्या वापराशी संबंधित नसूही शकेल. उदा मी काही पुस्तके वाचत असतो खास करून finance ह्या क्षेत्रात. मी त्या मानाने नवखा आहे,त्यामुळे जी पुस्तके मी खूप भारी म्हणालो आहे ती एखाद्या पारंगत व्यक्तीला खूप बेसिक वाटू शकतात. हे नीट पाहा.बऱ्याचदा कमी पाने आहेत, वगैरे लिहिलेले असते. ह्यालाही विशेष अर्थ नाही. मुळात अगदी ४.० च्या खाली स्कोअर असलेली पुस्तके आधी नकाच निवडू.

पुस्तक वाचताना, मी स्वतः सोबत जेमिनी चा खूप आधार घेतो. अगदी शाळकरी मुलाप्रमाणे परत परत उत्तर नीट मिळेपर्यंत विचारणा करत राहतो. हे अत्यंत उपयुक्त ठरते.सोबत स्टुडिओ वर असेन तर चक्क प्रिंट्स काढतो, file करून ठेवतो.

एक नव्हे तर असंख्य बुकमार्क वापरतो. पुस्तक वाचताना उपयोगी पडतात. काही विशेष पानांवर असलेला संदर्भ फक्त त्याच्या index वरून समजत नाही. तर तो माझ्या अभ्यास वहीत चक्क त्याचा पान क्रमांक टाकून मला त्यातून कोणता प्रश्न उत्तरीत झाला किंवा नवीन काय समजलं  हे माझ्या भाषेत, बऱ्याच दा मराठीत ( पुस्तक इंग्रजी असेल तरीही ) लिहितो. हे कुठेही पोस्ट करण्यासाठी नाही तर मलाच कुठे चटकन संदर्भ लागला तर खूप उपयुक्त पडते.


Wednesday, 30 July 2025

अनुत्पादक वार्षिक सोहळे

काल २९ जुलै. टाटा ह्यांचा जन्मदिवस साधून काही संस्थांनी समारंभ ठेवले होते, ज्यात सर्वोत्कृष्ट उद्योजक नामक पुरस्कार, आणि जोडून एखाद्या प्रथितयश व्यक्तीचे भाषण असे साधारण स्वरूप होते.

आता पुन्हा मी अशा कार्यक्रमांना न जायचे ठरवले आहे. कारण त्यात येणारा विदारक अनुभव. 

दोन्ही कार्यक्रमांत, ज्यांचा सत्कार केला गेला, त्या त्या उद्योजकांना ना बोलू दिले, ना त्यांच्या उद्योग प्रवासा बद्दल काही माहिती. उद्योजक सुद्धा अशा उथळ पुरस्कारांना पूर्ण भुललेले असतात असेच दिसत आहे. त्यामुळे ज्या करिता गेलो होतो ते एक कारण तर संपले.

दुसरे म्हणजे प्रमुख वक्ते जे काही सांगतील ते. दुर्दैवाने एकात एक मंत्री होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तिमित करणाऱ्या शैलीने तसेच अत्यंत प्रभावी अशा नम्रपणे वारंवार आयोजकांना खुष करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

दुसऱ्या कार्यक्रमात एक प्रथितयश उद्योगपती होते, ज्यांनी स्वतः चा PR अत्यंत कसब दाखवून करून घेतला, जोडीने खुपशी आश्वासने दिली. अशी मंडळी नंतर अजिबात भेटत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे ही देखील एक अत्यंत अंधुक अपेक्षा. 

दोघांच्याही कडून तसे काहीच विशेष विचारधन नाही मिळू शकले. भोजने वगैरे होतीच. अर्थात मी त्याकरता जात नाहीच. राहिला भाग नेटवर्किंग चा. त्याबद्दल देखील माझे आता वेगळेच मत तयार झालेले आहे. ते पुन्हा कधी.

तात्पर्य असे, की जे ऐकायला गेलो होतो, ते सोडून दोन्ही संस्थांनी मला पहा आणि फुले वाहा असाच सर्व प्रकार केला. त्यामुळे असल्या कार्यक्रमांना आता फुली.

Monday, 28 July 2025

माझे वेळापत्रक नव्हे.. "ऊर्जा पत्रक"


सोबतचे छायाचित्र आहे २७ जुलै च्या  सकाळ सत्परंग मधील. पान २ वरचे. वीणा वर्ल्ड च्या  वीणा पाटील ह्यांच्या "किचन आणि टॉयलेट" ह्या लेखातील. 

ह्या लेखात अजूनही छान संदर्भ सापडतील, तरीही आपल्या विषयाला धरून हे समर्पक वाटलं.

वीणा ह्यांनी सकाळची वेळ ही सूचित केली आहे, ज्यात त्यांना नवीन उपक्रमासाठी आवश्यक अविचलित एकाग्रता सापडलेली आहे. ह्यावेळी त्यांची ऊर्जा देखील सर्वोत्तम असते.

मी माझ्या वेळापत्रकाला आता ऊर्जापत्रक असे संबोधायला सुरुवात केली आहे. आणि "वेळेचं व्यवस्थापन" ह्या कालबाह्य संकल्पनेतून खरेच बाहेर पडण्याची गरज आहे आता. 

एक गोष्टीची कबुली : की शेवटी आपण वेळच तर manage करतो ना;  मग कशाला ही नवीन फंडूगिरी ?

META ची संकल्पना 

हे डिजीटल विश्वातील meta नाही. तर मी माझ्यासाठी केलेले एक सूत्र. कोणताही वेगळा विचार अंमलात आणताना काही गोष्टी द्याव्याच लागतात. त्या म्हणजे META.

M = Money
E  = Energy 
T  = Time 
A  = Attention 

ह्यातील Money, Time ह्या गोष्टी आवर्जून द्याव्या लागतात. पण Energy म्हणजे ऊर्जा मात्र खर्ची पडते. आवर्जून न देताही. ही स्वतः ची कल्पक ऊर्जा म्हणतो आहे मी. ही माझीच असते. ही सर्व ऊर्जा म्हणजे सर्जनशील, धैर्यशील, तुलनात्मक वगैरे मूल्यमापन करणारी मेंदूची शक्ती. आत्मशक्ती. 

माझाच नवीन प्रकल्प असल्याने ही ऊर्जा माझीच जात असते, आणि मलाच लावावी लागेल,लागते. ह्यात काहीच करता येत नाही. ही पुन्हा भरूनच काढावी लागते. आपण बऱ्याचदा म्हणतो की .... फुकट वेळ गेला यार! 

हे दुःख वेळ गेल्याचं कमी, आणि आता पुन्हा सगळं नव्याने करावं लागणार ह्याचं अधिक असतं. त्यामुळे अशी वेळ कमीतकमी यावी ह्याकरता आधी आपलं Attention म्हणजेच व्यवधान कुठे ठेवायचं हे ठरल्यास बहुमोल फायदा होतो. 

म्हणून ऊर्जापत्रक.

ऊर्जापत्रक म्हणजे :- 

# कमी गोष्टींचा संकल्प करणे 
# कोरडी शिस्त टाळून आनंदावर भर देणे
# ऊर्जा खाणाऱ्या गोष्टी हळूहळू नामशेष करणे
# आणि ह्यानुसार क्रमवारी करत वेळेची आखणी करणे.

रोजचे नियोजन नव्हे 

आपल्याला कॅलेंडर शी खेळायला जाम आवडतं. आणि मज्जा येते. करुयात. पण रोज प्रत्येक दिवशी हे व्हायलाच हवं असं नाही. उदा: एखादा लेख किंवा blog किंवा व्हिडीओ करायचा ठरवला, तर नेम नका लावू सुरुवातीला. किंवा चालायला जायचं ठरवलं, तर रोजच चालायला हवं असं काही नाही. कोरडी शिस्त जर तुम्हाला प्रेरित करत असेल तर त्यात पुन्हा मानसिक शक्ती म्हणजे ऊर्जा खर्च. 

जेव्हा वाटेल, तेव्हा विचार करून पहा.. "आत्ता लिहून पाहावं का ? व्हिडिओ ला  मस्त मूड आहे, करू का ?" आतून "हो" आलं, की झालं. करायला सुरू करा, जमेल तितकेच करा. अट्टाहास नको. 

स्वतः चाच ट्रेंड पहा ...

अशा पद्धतीने करा. फक्त व्यवधान राहू दे. आपलं ध्यान इकडे तिकडे भटकू द्यायचं नसेल तर व्यवधान म्हणजे Attention कुठे ठेवायचं हे आठवा. ते तुम्हाला दर्शक ठरेल. काही काळ स्वतः ला द्या. निष्कारण मोजमाप नको. आपला आपल्याला अंदाज येतो, आणि तो दाखवतो की अमुक गोष्ट मला अमुक कालावधीत किती वेळा जमते.साधारण ठरवा. की आठवड्यातून, पंधरवड्यातून मी दोन लेख लिहू शकते, किंवा आठवड्यात साधारण दोन दिवस मी संध्याकाळी ३० मिनिटे चालायला जाऊ शकतो किंवा आठवड्यातून एक व्हिडिओ मला तयार करता येईल वगैरे.

अतिरिक्त, जास्तीचे ध्येय नको 

सगळ्या जगाचाच हा रेटा असतो, की पहिल्या ३ महिन्यांत घेतलेल्या ध्येयापेक्षा आता जास्त वगैरे. हे पूर्ण टाळा. आपले उद्दिष्ट हे आहे, की जास्त काळ आनंदाचे काम आनंदाने करत वेळ जायला हवा आहे. त्यामुळे काहीच काळ एखादे काम करण्यापेक्षा एक आनंदाचा शाश्वत मार्ग शोधणे. त्यामुळे 

मोजके करू, 
जे आपोआप कायम, सहज, 
आत्मशक्ती न लावता होत राहील.

कंटाळा आला तर चक्क थांबा.

लिहिता लिहिता खूपच कंटाळा आला तर थांबा. ब्रेक घ्या. मध्येच WhatsApp तपासा. पण त्यात गढून जावू नका. घरातले एखादे काम करा. उदा. पत्नीला, स्वतः ला चहा करणे, वगैरे. परत बसा. तरीही नाही वाटले, तर सोडून द्या. फिर कभी.

प्रेरक वाटला विचार तर करून पहा, तुमचा काही वेगळा विचार असेल तर कमेंट मध्ये जरुर कळवा.

Tuesday, 15 July 2025

उद्दिष्टाचे स्मरण : प्रगल्भतेचे मानक

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात काल भारताची हार. बरंच शिकण्यासारखं. दोन्ही संघांकडून.

मला वाटलं, मी धुतलं 
यशस्वी जयस्वाल, हॅरी ब्रूक, ऋषभ पंत ह्यांनी संघाचा काहीही विचार न करता मनाला येईल तसा फटका मारला आणि आऊट झाले. ते ते चेंडू सर्वोत्कृष्ट नव्हते. काहीच नाही. आली सनक, हाणा.... मागचा पुढचा विचार शून्य. 

बाचाबाची अर्थात स्लेजिंग 
इंग्लंड सारखे संघ अगदी आधीपासून हे करतातच. मला आठवतं एकदा गावस्कर आणि एकदा अरविंद डिसिल्वा ह्याबद्दल बोलले होते, की ह्याकडे दुर्लक्ष करणे हे किती महत्त्वाचे आहे. कशासाठी ? स्वतः ची एकाग्रता ढळू न देण्यासाठी. पर्यायाने संघासाठीच. ह्याउलट शुभमन गिल ह्याने स्वतः भांडभांड केली. इथेच त्याची स्वतः ची एकाग्रता ढळली. 

फक्त उभं राहायचं होतं 

रेड्डी, बुमरा,सिराज, राहुल आणि दस्तुरखुद्द जाडेजा ह्यांना जे जमलं ते बाकीच्यांनी का बरं करू शकू नये ? जेफ्री बॉयकॉट च्या म्हणण्यानुसार "तासनतास उभे राहून अजिबात फटका मारण्याचं टाळणे" हे एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे ( क्रिकेट मध्ये ) आणि कौशल्य आहे ( व्यवसायात ).

तिकडे विंडीज आऊट झाले फक्त २७ धावांत ! कारणे : हीच, अशीच. अजून काय !

अंतिम उद्दिष्ट काय ?

ह्याचे थोडे जरी स्मरण असते, तरी अशा चुका घडल्या नसत्या. संयम का ? तर अंतिम उद्दिष्टकरिता. सामन्यात विजय. मनात आलेले फटके मारण्यासाठी अख्खा दिवस होता ना पडलेला.

अशाच चुका आपल्या व्यवसायात होत असतात. अशा वेळी अपेक्षित संधीचे नीट मूल्यमापन करून मगच त्यात शिरावे. कधी कधी "नाही" म्हणायला देखील हरकत नसते.

Saturday, 28 June 2025

सेवा - बीवा

काही प्रसिद्ध online व्यवसायांच्या "ग्राहक - सेवा" 

नुकतंच अमेझॉन वरून एक पार्सल ऑर्डर केलं. TDS मीटर+ PH Meter असे होते. अमेझॉन प्राईम असल्याने २ दिवसांत मिळणार होते. ज्या दिवशी यायचे त्याच दिवशी संध्याकाळी संदेश : आज नाही, दोन दिवस लागतील. दोन दिवस वाट पाहिली. पुन्हा सायंकाळी संदेश : आम्हीं म्हणे तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला, तुमच्या पर्यंत पोचता नाही आले, त्यामुळे दोन दिवस अजून लागणार.

ह्यांच्याकडे chat पटकन उपलब्ध नाही, फोन विषयच नाही. महत्प्रयासाने chat सापडले माणूस एकदम प्रॉम्प्ट पण प्रचंड मठ्ठ आणि अत्यंत फालतू स्मार्ट. त्याने अजिबात किती वाजता पार्सल मिळेल हे सांगितले नाही. आजही ( ८ पर्यंत देणार होता ) आलेले नाहीच. मी ऑर्डर रद्द केली. पुन्हा ह्या लोकांचा अभिप्रायाचा ठराविक स्क्रीन. माझ्या गरजेचं काय ? तपासच नाही.

असाच अनुभव axis च्या  क्रेडिट कार्ड कडून. काही केल्या ही मठ्ठ मंडळी स्टेटमेंट इमेल ने पाठवायला तयारच नाहीत. हद्द झाली यार.

ह्यांना तुमची काहीच पडलेली नाही.

इंडिया मार्ट :- इथे तर साधा सर्च करायची प्रचंड भीती वाटते. भयानक फॉलो अप सुरू होतो. आणि फीडबॅक वर फीडबॅक. साधं संभाषण कसं झालं ह्याचा सुद्धा प्रचंड फीडबॅक फॉलोअप. मूर्खपणाचा कळस.

सर्वात विनोद म्हणजे अमेझॉन च्या फीडबॅक फॉर्म वरचा empathy नामक एक पर्याय. 

काय बोलायचं आता ?

पूर्वी मशिनरी चे काम करताना ACC ह्या tata समूहातील बलाढ्य कंपनीने माझ्यासारख्या अती लघु उद्योगाला काम दिले होते. जैन नामक व्यक्तीने हे काम मोठ्या कंपनीला डावलून मला दिले ह्याबद्दल आश्चर्य वाटून मी त्यांना विचारले होते, तेव्हा त्याचं उत्तर ऐकण्याजोगे होते :-

" बडे कंपनी के सपोर्ट को पकड़ना मुश्किल होता है , छोटा पकड़ में आ जाता हैं "

Thursday, 19 June 2025

खरंच मराठी उद्योजक घडवायचे आहेत?

मी काही नेटवर्क चा सदस्य आहे अनेक वर्षे. इथे व्यावसायिक मंडळी कोट घालून भेटतात. ह्या गोष्टीला अनेक जण नाके मुरडतात.

असेच मग सर्व साधारणपणे मराठी भाषा वापरताना , खास करून सरकार दरबारी , अत्यंत जड शब्द वापरले जातात. शब्दाला शब्द असा अतिरेकी आग्रह सोडल्यास नक्कीच बरं होईल, शिवाय प्रत्येक ठिकाणी मूळ इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द असायलाच हवा असं नाही ना ! 

तरीही प्रत्येक ठिकाणी, अगदी साधे साधे लिहायचे, बोलायचे झाले तरी इंग्रजी चा वापर का बरं ?

अजून एक म्हणजे :- हे कोणी सांगितले की मुलाना इंग्रजी शाळेतच घाला ? इथे मराठीचा दुस्वास करायचा, तिला निष्कारण कमी लेखायचं आणि मराठी उद्योजक घडवायचे !

आशेचा किरण 

नवीन शैक्षणिक धोरण मात्र आशादायक आहे. 
प्राथमिक वर्षांत तरी सरकारने मातृभाषा प्रमाण ठेवली आहे ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन

Sunday, 11 May 2025

कंपनीबद्दल बोला .....

काल एक सत्र घेत असताना लक्षात आलं की खास करून लहान उद्योजक, अगदी घरून व्यवसाय सुरू करणारे देखील ज्यात येऊ शकतात, अशा व्यावसायिक मंडळींना कमी वेळात ( जास्तीत जास्त १० मिनिटे ) त्यांच्या व्यवसायाची माहिती द्यायला सांगितली तर सर्वात जास्त ते त्यांच्या उत्पादने अथवा पैलू, त्यातील विविध वैशिष्ट्ये इत्यादींबद्दल भरभरून बोलतात. वेड, passion वगैरे वगैरे...

पण ही मंडळी *भरभरून बोलतच सुटतात*. इतकी, की कदाचित पलीकडील टेबलवरून घंटानाद ऐकू येऊ शकतो. आणि अगदी वेळेचं बंधन नसेल तरी ऐकणारा तुम्हाला मनातून बंद पाडू शकतोच की !

जैसा देस वैसा भेस

ज्याप्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे त्याप्रमाणे हे असायला हवे. अनेक, विविध परंतु अनोळखी व्यक्ती समुदायासमोर आपले सादरीकरण असेल,तेव्हा आपल्या संस्थेबाबत अधिक बोलायला हवे. तिची महती.

कारण मुळात आपण देत असलेली सेवा तसेच उत्पादन अनेकांपैकी एक असेल, तर मग ह्या अनेकांतून एक म्हणून मला,आम्हाला का निवडा  हे संभाव्य ग्राहकाच्या मनापर्यंत पोचायला हवे ना !



Tuesday, 6 May 2025

संस्था अंतर्गत प्रशिक्षणाचे महत्त्व

कालच एका संस्थेत "समन्वयक" अर्थात Co-Ordinator म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीशी संवाद सुरु होता. ती तिथल्या कर्मचारी वर्गाच्या विचित्र वागण्याबाबत खेद कम आश्चर्य व्यक्त करीत होती. कारण देखील तसेच होते. 

सदर संस्था ही एक सामाजिक संस्था आहे, ५० वर्षे जुनी , उदात्त विचारांनी निर्मित झालेली आहे. मूल्ये स्पष्ट आहेत, अधोरेखित देखील असावीत. आणि वर्षानुवर्षे अनेक अनुभवी व्यक्तींच्या चाळणीतून चाळून झालेली असणार. 

तर त्यांचे एक व्यावसायिक मूल्य असे कि इथे येणाऱ्या कर्मचारी मंडळींना "लेटमार्क" केला जात नाही. कारण असे, कि ही काम करणारी मंडळी देखील तशी संघर्षमय परिस्थितीतूनच आलेली असतात. तर त्यांना मानवता वादी दृष्टीकोनातून इतकी सवलत देणे हे देखील एक प्रकारचे सामाजिक भान व काम आहे. अशी सवलत देवू करणारी मी तरी पहिलीच संस्था पाहिली. आणि हेच दुखणे आमच्या समन्वयक व्यक्तीचे होते. 

की असे असून देखील, इथे काम करणारे कर्मचारी संस्थेचा खूप ( उगाचच ) दुस्वास करतात. नावे ठेवतात, वगैरे. संस्थेच्याही  काही  डाव्या  बाजू  असणारच  रे  अशी माझी खास खोचक शंका देखील काढून झाली. पण एकंदरीत संस्थेकडून फार अन्यायकारक काही घडत नाहीये हे लक्षात आले. मग असे का बरे होत असावे ?

सामाजिक संस्थेबाबत अशी स्थिती असेल, तर खाजगी नफा उद्दिष्टीत संस्थांबद्दल काय बोलावे ? 

पण अगदी हे काळे , हे पांढरे असे नको करायला, कारण अशाही अनेक संस्था ( खाजगी ) , ज्यांना "उद्योग" म्हणता येईल, पाहण्यात आहेत, ज्यांच्या बद्दल कर्मचाऱ्यांना नितांत आदर आहेच, शिवाय ते स्वत: आनंदी देखील आहेत.

मला भासलेल्या काही गोष्टी :-

१. खाजगी संस्थांबाबत बोलायचं झाल्यास, नुसता "नफा" ह्यापलीकडे काय विशेष आपण करतोय, कोणत्या प्रकारे लोकांच्या आयुष्यात ( म्हणजे ग्राहक वर्गाच्या ) क्रांतिकारक बदल घडवून आणीत आहोत, हे शोधणे, तपासणे, आणि ते व्यवस्थित लिहून काढणे

२. ह्या मूल्याकरिता स्वत: प्रवर्तक, किंवा मालक मंडळी किती कटिबद्ध आहेत ह्याचं स्वत: वस्तू निरपेक्ष मूल्यमापन करणे. 

३. ह्या नंतर आपल्या विविध संबंधित व्यक्तींमार्फत ही अंतर्गत मूल्ये कशी पोहोचतील, ह्याचा कृती कार्यक्रम तयार करणे.

प्रत्येक संबंधित व्यक्ती करिता ह्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नवीन रुजू होणारे, बढती प्राप्त होणारे, पदभार बदललेले, वगैरे वगैरे.

हे फक्त मोठ्या नव्हे, तर अगदी एक - दोन व्यक्ती असणाऱ्या संस्थांकरिता देखील आवश्यक आहे. आपण ज्या संस्थेकरिता काम करत आहोत, ती संस्था काय आहे, तिची मूल्ये काय आहेत हे समजल्यास कर्मचारी वर्ग टिकवून ठेवण्यास त्याचा निश्चितपणे उपयोग होईल.

Wednesday, 11 December 2024

आपण उद्योजक आहात ना ? ही वाट वेगळीच असते, आहे !

उद्योजक म्हणजे काय ? तर नोकरी करून दुसऱ्याच्या उद्योगासाठी आपली क्रयशक्ती आणि व्यवधान फक्त मासिक मानधानाकरिता न 🚫देणारी व्यक्ती. 

💪हा निर्णयच असतो, काल परत्त्वे तो निश्चया कडे झुकू लागतो. धार वाढत जाते. कधी अगदी हट्टी पणा कडे जाते. 

कधी कधी आपण म्हणतो.... "कि अरे इतका कशाला त्रास करून घ्यायचा ? इतकं का कुटुंबाला दावणीला लावायचं ?, धरायची एखादी नोकरी, कमीपणा काय त्यात ?"

पण तरीही तो/ती ते सोडत नाही. ह्यातून कदाचित तो उद्योग सावरतो, आणि एक आदर्श म्हणून उभा राहतो. ज्यातून हे नक्की शिकता येतं ... कि जिद्दीला पेटून ह्याने/हिने हे तडीस नेलं.

आणि जरी नाही सावरलं तरीही ती वाट निश्चित वेगळी होती, जी एखाद्या धनाढ्य बहुराष्ट्रीय उद्योग समूहाच्या प्रमुखपदी असणाऱ्या व्यक्तीच्या प्रवासापेक्षाही अधिक रोमांचक असते, ह्यात वादच नाही. म्हणूनच मला सुंदर पिचाई पेक्षा श्रीनिवास ठाणेदार जास्त भावतो !

उद्योजकता सांभाळायला Guts नक्कीच लागतात boss !

आज निवडक उद्यमी चा वाढदिवस ! 

अशा असंख्य उद्योजकांना सलाम, ज्यांनी आपल्या कडील सर्वस्व पणाला लावलं , उद्योग नाही सावरला😢.

👏👏तरीही तुम्ही आदर्श आहातच ! कारण तुम्ही ती वाट चालायचं धैर्य दाखवलंत आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला ह्या वाटेतील धोके दाखवत राहता , जेणे करून पुढचा वाटसरू त्याची वाट यशस्वी रित्या चालेल !

Saturday, 31 August 2024

ह्यांना धंद्याची गरज नाहीये !

अनेक प्रदर्शनांना जो अनुभव येतो, तोच पुन्हा काल सुद्धा कॉपी पेस्ट. गंमत म्हणून अनुभव पोस्ट करतो, तुम्हाला पटेल, की शीर्षक किती योग्य आहे :-

१. मी stall धारक मंडळींना म्हणालो कि तुमचे मालक माझे मित्र आहेत, अनेक वर्षे ओळख आहे.

२. stall धारक जी यंत्रे विकतात , तीच मी सल्ला स्वरूपात देतो-देत असतो

३. प्रदर्शन मुंबईला, मी एका पुण्याच्या उद्योजकाला म्हणालो, अरे, माझी factory तुमच्या जवळ होती 

४. काही ठिकाणी मशिनरी मांडलेली, त्यावर बाटल्या च नाहीत, हा कसला डेमो !

५. एखाद्या ठिकाणी म्हणालो, कि Video करू का ? तर म्हणे Youtube पे देखो ना !

एक ना दोन, अनेक अनुभव, वरील एकही अनुभवात stall धारक व्यक्तीने ना नांव विचारले, ना काही उत्सुकता दाखविली.

असाच एक वेगळा अनुभव पुण्यात Startup Exhibition ला आला होता. तिथे ६ पर्यंत वेळ असूनही खुद्द stall धारक जे स्वत: Founders होते तेच ५ वाजता गाशा गुंडाळून मोकळे, तर दुसऱ्या एका stall वर Hospital साठी लागणारे एक Software होते आणि शेजारी Hospital साठी यंत्रे तयार करणारा Stall. दोघेही ३ दिवसांत एकमेकांना साधे भेटलेले देखील नाहीत.

बिझनेस नेट्वर्किंग क्लब्स मध्ये काही वेगळा अनुभव येत नाही. कित्येक वेळा रेफरल दिला असेल, आणि काय झाले म्हणून चौकशी केल्यावर सांगतात ... "त्यांच्याकडून काही आलेच नाही हो". बाबा, तुला धंदा देणे हे एकच काम आहे त्याचं आणि माझं जणू ...

मग फक्त इतकंच वाटतं ... ह्यांना गरज च नाहीये .....

Tuesday, 30 July 2024

"चालायचंच" कधीपर्यंत .....?

काल एका संस्थेच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. खरं तर कंटाळा आलेला, हल्ली जिकडे तिकडे कार्यक्रम. तरी माझे मित्र बीमन गांधी ह्यांनी येण्यात रस दाखवला आणि गेलो.

कार्यक्रम तसा वेळेत सुरु झाला, पण नेहमीप्रमाणेच त्या त्या संस्थांच्या नवीन अध्यक्ष मंडळींचे हस्तांतरण, सत्कार इत्यादी कार्यक्रम तुफ्फान लांबविले. ( हेच कदाचित दाखवायचं असतं ह्या मंडळीना ) ज्यातून प्रत्यक्ष वक्ते मंडळींना बोलायला खूप उशीर झाला.

त्यापूर्वी ह्या सत्कारांमध्ये काही उद्योजक मंडळींचा सत्कार केला गेला. त्यावेळी त्यांची दृकश्राव्य फीत चालविली गेली. 

ह्यावेळी आवाजच आला नाही ! तांत्रिक दोष म्हणे !

त्यामुळे नुसत्याच पडद्यावर मूक आकृत्या आणि मग काय ... प्रेक्षक आणि प्रत्यक्ष वक्ते सुद्धा गप्पांत मग्न झाले.

सगळाच poor show ! एवढा मोठा hall घेतलेला, नंतर जेवण-फीवण होतं, आणि हे सर्व विनामुल्य होतं. म्हणजेच प्रत्यक्ष संस्थेचा किंवा प्रायोजक मंडळींचा होता ना हा पैसा. 

कुणी म्हणेल .... "चालायचंच" .....

हेच म्हणतो : कधीपर्यंत ? 

काही इतर गोष्टीही आक्षेपार्ह जाणवल्या :-

वक्त्यांची ओळख नीट करून दिली जात नव्हती 

ते बोलणारे लोक व्यवस्थित निवडलेले नव्हते 

ह्यातही एक दृकश्राव्य फीत प्ले झाली शेवटी, ज्यात एका मराठी व्यावसायिक मंडळींसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचा उल्लेख होता. त्यात दृक फीत फारच दर्जाहीन होती. त्यातील मराठी ऐकून घेरी यायची पाळी आली.

इतकही कसं पाहत नाहीत ? वर्षात जेमतेम एकदा मिळणारी संधी, कशी काय हलक्यात घेतात ?

Friday, 26 July 2024

Value Proposition आणि Title Songs ....

पूर्वी "अवंतिका" नामक एक मराठी मालिका गाजली होती. त्यातील मध्यवर्ती भूमिका मृणाल कुलकर्णी ह्यांनी साकारली होती. चौकटीत असूनही वेगळे निर्णय घेऊन आयुष्य जगणारी एक सक्षम आणि कर्तव्यदक्ष अशा गृहिणीचा रोल ( बऱ्याच स्त्रिया करतच असतात हे ) त्यांनी खुपच सुरेख वठवला होता.

अवंतिका

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे

जीवनाशी ती कधीची भांडते आहे

दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती 

वेगळे काहीतरी बघ सांगते आहे 

जीवनाचे एक गाणे गात जाताना 

वेगळीशी चाल त्याची बांधते आहे 

जीवनासाठी जणू ही अकस्मिता 

सुख आणिक दु:खवेडी, अवंतिका !

ह्या प्रतिमेचे संपूर्ण प्रतिबिंब ह्या मालिकेच्या Title Song मध्ये उमटते. ह्या गाण्याचे बोल आणि संगीत अतिशय समर्पक आहेच, शिवाय गायन सुद्धा अगदी संयत आहे. कुठेही शब्दांना सूर, गायन वरचढ करीत नाहीत. अगदी वाद्ये सुद्धा !

शेवटी, Title Song म्हणजे त्या संपूर्ण मालिकेचा एक Catalogue च की.

अनेक मालिका त्यांच्या Title Songs मुळे चालतात. ती ती गाणी त्या त्या मालिका पाहून दर्शकांना काय मिळेल ह्याची खूपच कमी वेळात चुणूक देतात, ही त्यांची खासियत. 

हेच Value Proposition. 

Wednesday, 24 July 2024

उत्तरदायित्व वगैरे ......

बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे एक सुरेख तंत्र आहे, ज्याद्वारे आपण आपल्या प्रस्तावित व्यवसायाचा किंवा योजलेल्या नवकल्पनेचा धांडोळा एका पानावर झटक्यात जेमतेम ९ रकान्यात घेवू शकतो.

ह्यात सर्वात प्रमुख असलेला रकाना आहे तो म्हणजे "Value Proposition". असं काय तुमची कल्पना त्याच्या लाभार्थी ला देईल, ज्याकरता त्याने तुम्हाला त्याचे उचित मूल्य द्यावे. हे मूल्य स्वीकारताना, ते देवू करण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे येतेच.

गीतेत ह्यालाच स्वधर्म असे संबोधले आहे. 

विषय खरे तर वेगळाच आहे, तरीही जरा निगडित आहे म्हणून लिहीतोय. नुकताच केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात पायाभूत सुविधा म्हणजेच ज्यात दळण वळण, लोहमार्ग, मेट्रो इत्यादी येतं. ह्या वर भरभक्कम रक्कम योजली आहे. सोबत कौशल्य विकास ह्यावर देखील तरतूद केलेली आहे.

ह्या दोन गोष्टींना धरून पुणे लोणावळा रेल्वे मार्ग वाढविणे ह्या एका प्रकल्पावर अशक्य दुर्लक्ष झालेले आढळते. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार हा प्रकल्प पुणे, PCMC सोबत रेल्वे करणार होती. ज्यात कंटाळून शेवट रेल्वे स्वबळावर करणार आहे म्हणे. हा प्रकल्प allready ५ वर्षे रखडला आहे, आणि ह्यापुढे ( इतर अडचणी न आल्यास ) अजून ४ वर्षे चालेल म्हणे. म्हणजे एक मूलभूत जनोपयोगी निर्णय, ज्याला दुप्पट वेळ ( आणि खर्च सुद्धा ) लागावा ह्या सारखा मूर्खपणा दुसरा दिसत नाही.

दुसरीकडे मेट्रो, मुंबई पुणे अतिरिक्त महामार्ग इत्यादी आकर्षक प्रकल्प ह्यावर भर दिला जातो. पुणे लोणावळा लोकल मात्र सहज रद्द केल्या जातात. लोकं सुद्धा मुकाट सहन करतात.

ते तर ठीकच आहे, पण मुळात ज्यांना हे कौशल्य द्यायचं ते कनिष्ठ उत्पन्न गटातील प्रत्यक्ष काम करणारे लोक असतात. चाकरमाने. तर त्यांचे दळण वळण हे सुकर झाले तर आपला स्वधर्म निभावेल इतका व्यवहार तरी उमजणे नक्कीच अपेक्षित आहे !

यानिमित्ताने मी माझ्या व्यवसायाबाबत विचार करताना त्यातील मूल्य माझ्या ग्राहकांना पोचवायचा सतत विचार करायलाच हवा आहे ह्याची पुन्हा जाणीव झाली. त्यात जे resources मी अमलात आणतो, वापरतो खासकरून मनुष्यबळ त्यांना काही अडचणी येत आहेत का, हा विचार केंद्रस्थानी असायला हवा,हे ठळकपणे जाणवले.

Monday, 22 July 2024

निवडक उद्यमी Whatsapp ग्रुप : शिकण्याची अमुल्य संधी !

२०१९ साली तयार झालेला निवडक उद्यमी whatsapp ग्रुप आत्ता आहे तसा नव्हता; म्हणजे काय, तर तमाम जनांना जे हवं ते सर्व होतं त्यात .... उदा : भरपूर मेम्बर, त्यांच्या भरपूर पोष्टी, उलट सुलट ( उगाचच ) चर्चा; मग त्यात आपसूक येणारे Forwards, त्यांना Monitor करत राहणे, मास्तर गिरी इत्यादी. कलकलाट नुसता. 

आम्हाला हे नको होतं, म्हणजे निष्कारण मास्तर पणा नको होता, आणि एकमेकांच्या अनुभवांतून निखळ शिकणे हे अपेक्षित होतं. त्यामुळे पुढे आम्ही फक्त मोजक्या मंडळींना ठेवलं म्हणजे तेवढेच राहिले, आणि कमी कमी होत गेले.

नंतर नंतर तर साप्ताहिक झूम मिटींग्स सुद्धा गरजे नाशा झाल्या , आणि आम्ही फक्त Podcasts सुरु केली. ही म्हणजे काही मंडळी आपण जे एकमेकांशी गप्पा स्वरूपात बोलतो, तेच झूम वर बोलायचं आणि रेकॉर्ड करून youtube वर पोस्ट करायचं इतका माफक उद्देश. टिपिकल podcast setup नाही.

शिवाय समोर येणारे आणि अनुभवाला येणारे प्रश्न आम्ही घेवून बोलतो. हे सर्व youtube वर आहे. 

ह्या खेरीज निवडक चा एक फेसबुक ग्रुप सुद्धा आहेच. त्यावर बरीच मंडळी प्रोमो पोस्ट्स वगैरे टाकत असतात.

पण निवडक ची खरी ताकद म्हणजे whatsapp ग्रुप. ज्यावर अजिबात भारंभार पोस्टिंग नाही, कि वायफळ चर्चा नाहीत, जोक्स नाहीत, शोकसभा नाहीत किंवा मेम्बर ची भलावण करणाऱ्या अंगठेबहाद्दर पोस्ट्स नाहीत. 

आहे तो एक निव्वळ संवाद : एखाद्या छानशा प्रश्नाला धरून केलेला !

एक प्रकारे अजिबात disturbance नसलेली एक शाळाच म्हणा ना ! बिन शिक्षकाची ....

टीप : हा ग्रुप मात्र Paid आहे. माफक आहे फी , परंतु paid आहे. 

 

Tuesday, 2 July 2024

किंमत upfront टाकावी की नाही ?

आपण जे काही विकत असतो , त्याच्या किंमती बद्दल विचारणा होते ( साहजिकच ). कुणीही किंमत विचारताच ( किंवा पगार सुद्धा ) तिथल्या तिथे न सांगण्याचा एक प्रघात आहे. मला वाटतं कि आपला अपेक्षित ग्राहक Filter Out करण्याची मौल्यवान संधी आपण घालवून बसतो. 

माझ्या बाबतीत म्हणाल, तर मी फक्त किंमतच नव्हे, तर इतर अनेक गोष्टी ज्या माझ्या Offering सोबत कराव्या लागतात, त्या देखील बऱ्या पैकी स्पष्टतेने सांगतो. जगाचं ठावूक नाही, पण माझ्यासाठी गोष्टी थोड्या सोप्प्या होतात हे मात्र निश्चित. पूर्वी ( २००९-१० मध्ये ) जेफ मिल्स नावाच्या एका ट्रेनर कडून एक छान विचार मी ऐकला, पटला देखील :-

माझ्या उर्वरित आयुष्याचं ध्येय काय ? तर ते कमीत कमी गुंतागुंतीचे व्हावे ! केवढी स्पष्टता !

त्यानंतरच मी माझ्या मिनरल water website वर किंमत, जागा, वगैरे गोष्टी खणखणीत पोस्ट केल्या. अजूनही ट्रेनिंग मध्ये ह्या सांगतो. आपल्या गतायुष्यातील अनुभवांतून मी शिकतो, आणि पुढे तरी ( निदान ) असं होऊ न देणे ह्याकरिता अवश्यक ते बदल मी घडवतो.

तर मी काय काय सांगतो ? उदा : मिनरल water ट्रेनिंग :-

किंमत ( अर्थात ) 

वेळ किती द्यावा लागेल 

पैसे आगाऊ द्यायला लागतील

discount नाही कारण सेवा सुद्धा मर्यादित नाही 

काय मिळणार नाही : उदा सप्लायर्स चे पत्ते, परवाने मिळविण्याच्या प्रोसिजर, यंत्रे वापरण्याचे तांत्रिक ज्ञान इत्यादी 

त्या आधी बरेच विनामुल्य असे थेट साहित्य मी देवू केलेले असतेच. ही काही रणनीती नव्हे. तर "आस्था" आहे. ज्याला व्यवसाय सुरु करायचा आहे, त्याला उपयुक्त ज्ञान देणे. मग माझं चरितार्थ ? माझे mentoring ( त्यांना वाटले तर ते येतीलच कि ), आणि येतात. फक्त माझ्यातल्या त्या x factor करताच !

बऱ्याच वेळा लोक डिजिटल साठी येतात ... त्यांना मी स्पष्ट कल्पना देतो, बजेट सांगतो, आणि तरीही तुम्ही स्वत: काही केलं नाही तर अपेक्षित परिणाम येणार नाहीत हे-सुद्धा आवर्जून सांगतो.

परिणाम : माझं उर्वारेत आयुष्य कमीत कमी गुंता गुंतीचे व्हावे !

हे तेव्हाच होईल, जेव्हा माझं जे offering आहे, किंवा जे काही मी देवू पाहतोय, trade करू पाहतोय ते त्या घेणाऱ्याच्या खरेच उपयोगी पडेल. ह्याची कसोटी सुद्धा सोप्पी आहे :- माझे mentoring चे प्लान्स आहेत, साधारण व्यावसायिक ३-४ वर्षे ह्यात जोडला जावा ह्याची अपेक्षा असते. तो आधीच गळाला तर समजायचे कि त्याला अपेक्षित जे, ते द्यायला मी कमी पडतोय. इथेच माझ्या Filteration ची पातळी अजून विस्तारते. असो.

तर माझे मत किंमत upfront "टाकावी" असे आहे .

तुमचं काय, आणि त्यामागची विचारधारा काय हे सुद्धा सांगा !