Friday, 7 August 2026

कंटाळा : थोडे विचारमंथन

कालच एका व्यक्तीसोबत चर्चा सुरु असताना तिने मला सुचविले 

" तुझ्या तोंडात सारखा हा कंटाळा आला हा वाक्प्रचार असतो. तो काढून टाक यार "

इथून ह्या विचार मंथनाची सुरुवात झाली. मग made डॉ आनंद नाडकर्णी ह्यांचे कधीतरी वाचलेले आठवले कि कुठे असतो हा कंटाळा , दाखवा कि जरा ! पण असतो यार. मनासारखेच आहे, हवे सारखेच आहे. दिसत नाही,पण त्याची प्रारूपे मात्र दिसतात. 

तर काहीतरी आवश्यक असलेले करावेसे वाटत नाही हे त्याचे प्रमुख व्यक्त रूप.

आता हे का करावेसे वाटत नाही, हे पाहायला लागलो. उत्तर : उर्जा कमी पडली. का ? तर ती कमी झाली असेल. कदाचित वयोमानाने. पण तरुण मुलांनाही येतोच कि कंटाळा ( हास्य जत्रेत ओंकार चा कंटाळा नामक एपिसोड पहा कधी ). पण ह्याला बऱ्याच अर्थी वाईट च लेखले गेलेले आहे हे मात्र त्रिवार सत्य. 

मला तर माझे Offering नीटपणे अधिक सखोल करायला हा कंटाळा खुप मार्गदर्शक ठरतोय. आणि आता मी त्याला सरावलोय. हे जे काही Passion वगैरे म्हणतात ना, त्याची तपासणी करताना ज्याचा कंटाळा येतो ना, त्या गोष्टी आवर्जून बाजूला करा. उरेल, फक्त आवड. आणि आवडीचं काम करताना सुद्धा कंटाळा येवू शकतोच कि. आपण Burn Out होतो, पैसे अनेक काळ मना जोगते मिळत नाहीत वगैरे. इथेच कधी घोळ होऊ शकतो.

कारण जे लावून धरलेलं असतं त्यातून कधी उगवेल, ठावूक नाही आणि पोट तर भरत नाहीये. अशावेळी Guilt येवू शकतो आणि हेच ते Distraction. कालच एका उद्योजिकेशी  मला Part Time Job हवाय ह्या विषयावर बोलताना तिची अडचण, घालमेल मला समजली. हे असं सारखं पैसे मागत जगायचा कंटाळा आलाय तिला. म्हणजे थोडक्यात अनेक काळ मना जोगते मिळत नाहीत  ह्याचाच ! Job पाहणं हे नक्की distraction. पण तिच्याच क्षेत्रात पाहणं हा उपाय. अजून खोल जावून आपलं निश्चित काम निवडून, ठरवून आयुष्यभर आपल्या जगण्यासोबत कसं Relate करता येईल, हे पाहण्यासाठी हे Distractors येत असतात. Stoic Philosophy मध्ये एक सिद्धांत च आहे :

अडथळे हाच मार्ग 

झाला कंटाळा Channelize. 

Guilt नको.

Monday, 6 July 2026

आशेचा एक लहानसा किरण

मी आता खाली एक इमेज शेअर करतोय. कदाचित तुम्हाला काही समजणार नाही, पण मी समजावून सांगतो, आणि समजावून घ्या. कदाचित तुम्हाला बहुमोल माहिती मिळेल, उपयोग होईल.


ह्यात नमूद केलेल्या आकड्यांचा संदर्भ 


मी ह्यापूर्वी एक लेख दिला होता कि ज्यात मी गुगल सर्च कन्सोल नावाच्या विनामुल्य उपयुक्ततेबद्दल लिहिले होते, ज्याद्वारे मी माझ्या जखमी व्यवसायाबद्दल ( धन्यवाद AI ) बोललो होतो. 

त्यात माझ्या वेबसाईट वरच्या काही ( बहुतेक सर्व ) इमेजेस ह्या नवीन Algorythm नुसार मोबाईल वापरकर्त्या मंडळींना अजिबात योग्य वेळात लोड होत नसल्याने गुगल माझ्या website चा अनुभव Poor म्हणून गणत होते. त्या मी आता Improvement करिता परिश्रम घेतो आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील सदर निकाल आहेत :-

आकड्यांचा अर्थ

  

१. Core Web Vitals : ह्यात फरक पाडणाऱ्या प्रमुख बाबी ( उदा. इमेजेस ) बद्दल बोलले गेले आहे. 
२. ह्यात सध्याची स्थिती दिलेली आहे. २९ हा सध्याचा ( जून 26 ) आकडा आहे. म्हणजे अशा २९ ठिकाणी अजूनही Poor अनुभव येतोय, २१ ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे. एकूण ५० आहेत. 
३. प्रवास Poor कडून Good कडे :- अजूनही Good URL नाहीयेत. परंतु एप्रिल मध्ये काम करायला घेतले तेव्हा सर्व ५० जागा Poor होत्या. लाल रंग Poor , नारिंगी रंग ठीकठाक , तर हिरवा रंग उत्तम दर्शवतो. प्रवास पाहता येईल.

ह्या सगळ्याचा काय उपयोग ?


माझे घसरलेले Ranking सुधारणे. आणि मला पूर्ववत विचारणा सुरु व्हाव्यात. अर्थात हे एका रात्रीत होणारे काम नाहीच. शिवाय हे एकमेव नाही. ह्याच्या जोडीने अनेक गोष्टी कराव्या लागतात, करत राहाव्या लागत आहेत. आणि तरीही आव्हानात्मक आहेच. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शोध घेणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनातच आता फरक पडला आहे.

क्रमशः पुढचा अपडेट पोस्ट करेनच !

Saturday, 21 March 2026

गुगल सर्च कन्सोल : एक दुर्लक्षित उपयुक्तता

काही वर्षे माझी अशी समजूत झाली होती ( आणि ती काही अंशी खरी सुद्धा होती ) , की आता महत्त्व ( फक्त ) व्हिडीयोज ना द्यावे. कारण सुमारे २०१३ पासून माझ्या web वरची माझी खरी मालमत्ता ( म्हणजे माझी website ) तर तयार आहेच; शिवाय ती बऱ्या पैकी पहिल्या पानावरचे स्थान राखून सुद्धा आहेच. 

परिणाम स्वरूप २०१९ नंतर ( जवळ जवळ ७ वर्षे ) मी website साठी काही कंटेंट लिहिला नाही, शिवाय त्याकडे काही लक्ष देखील पुरवले नाही. 

विचार इतकाच : की व्यवसायात काही बदल झालेला नाहीये, की त्याच्या स्वरुपात, पद्धतीत. आणि जे काही विचार मांडायचे आहेत, ते तर Youtube द्वारे सुरूच आहेत की.

गेल्या काही महिन्यांतला बदल 

गेल्या ( खरे तर वर्षभर ) सहा महिन्यांत , आणि जास्त करून जानेवारी पासून एक विचित्र अनुभव येत आहे, की मला ट्रेनिंग करिता येणारी मंडळी अगदी गंभीर रित्या कमी झालेली आहेत. 

प्रत्येक तिमाही ला आढावा घेण्याच्या पद्धतीचा खूप मोठा फायदा 

गेले दोन वर्षे आम्ही प्रत्येक तिमाही ला बसून परिस्थिती चे मूल्यमापन करतो, शिवाय पुढच्या तीन महिन्या मध्ये अगदी काही झाले तरी कार्य पद्धतीत मोठ्ठे बदल करत नाही. उलट सखोल विचार करणे, मूळ तत्वांना धक्का न लावणे ह्या गोष्टी कसोशीने पाळतो. ह्यामुळे "नक्की काय होत असेल" ह्याचा नीट विचार करता आला. नाहीतर उथळ विचारांना बळी पडून मोठे नुकसान होऊ शकते. 


काय आढळले ?

आम्ही विचार करत होतो, तसा बाह्य परिस्थितीचा विशेष फटका बसलेला नाहीये

तर लोकांच्या माहिती शोधण्याच्या पद्धतीत घडून आलेला बदल ह्याचं आहे हा फटका. 
तरुण मुले , तसेच ज्यांना ठावूक आहे अशी सर्व मंडळी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर करतात.
जी मंडळी पारंपारिक गुगल सर्च वापरतात, त्यानाही प्रथम कृत्रिम बुधीमत्तेचाच पर्याय दिसतो. 


फरक कसा पडला आहे ?

आता Chat GPT किंवा Gemini मुळे मंडळी व्यक्तिगत प्रश्न विचारतात. 

ही नवी सर्च इंजिने त्यांचे व्यक्तिगत मुद्देसूद, आस्थेने अमर्यादित, उलट सुलट शंका निरसन करतात. ही उत्तरे ही इंजिने इंटरनेट वरूनच शोधतात. ही सर्वात सुयोग्य उत्तरे सर्वात जलद देण्याची कटीबद्धता गुगल अर्थातच राखून आहे. माझ्या पाहण्यात आले, की गेल्या ६ आणि खास करून ३ महिन्यापासून गुगल आता फार जुना ( माझा बराचसा ) आशय दाखवत नाही. आणि दुसरा तितका तुल्यबळ आशय उपलब्ध नसेल, तर दाखवेलही काही काळ ( हेही माझ्या बाबतीत झालंय ). आणि जरी समोर माझ्या वेबसाईट वरील मजकूर दाखवला तरीही काही अशा अटकळी आहेत, की ज्या द्वारे आपल्याला कळू शकते की लोक आपली website उघडूनच पाहत नाहीयेत

तर गुगल कडे ही माहिती जात राहते आणि हा क्लिक थ्रू रेशो ( CTR ) सातत्याने कमी कमी होत चालला असेल, तर गुगल किंवा इतर AI इंजिने अनुमान बांधतात, की आता ह्या links लोकांना देत राहण्यात अर्थ नाही.

हे कसं दुरुस्त करायचं  ?

मी इथे जेमिनी च्या मदतीनेच हे केले. म्हणजे "काय करू" ची अगदी Step By Step मदत घेत आहे. तर आधी काय होतंय हे पहायचं : ते गुगल सर्च कन्सोल च्या मदतीने. हे एक अतिशय कमी ठावूक असलेलं अत्यंत उपयुक्त , विनामुंय असं हत्यार आहे. ज्याद्वारे आपल्या Website वर काय सुरु आहे हे समजते. खूप सखोल शोधा अंती मला अनेक गोष्टींसोबत एक प्रमुख गोष्ट सापडली, ती म्हणजे माझी पेजेस महिनोंमहिने mobile वर झटपट लोड होत नाहीयेत. त्यामुळे बघा काय फरक पडलाय :-👇

२०२५ वि. २०२६

इम्प्रेशन मध्ये किंचित वाढच आहे, परंतु क्लिक्स मध्ये मात्र लक्षणीय घट आहे, आणि ती वाढतच चालली आहे ( होती ). आता ह्यावर काम सुरु केलेले आहे. आणि थोडी थोडी परिस्थिती सुधारत चाललेली आहे.  





Thursday, 13 November 2025

तोच ( ग्राहक ) च नसेल, तर मी कुठून असणार !

​नेटवर्किंग मध्ये काम करत असताना कसे कसे अनुभव येत राहतात, जे शिक्षण म्हणून नाही घेतले ना, तर नक्की वैफल्य येईल. नुकताच आलेला एक अनुभव असा :

मला प्रवासाला जायचे होते. मी शक्यतो माझी हॉटेल खोली वगैरे माझी मीच पोर्टल वरून बुक करून जात असतो. गेल्या वेळी मला असे वाटले, की एखाद्या प्रवास यात्रेच्या सुविधा देणाऱ्या एखाद्या व्यावसायिक व्यक्तीमार्फत हे काम करावे. उद्देश असा की फक्त कमी पैशात सर्व काही असे न असता जरा ऐसपैस , तिथली रूम सेवा वगैरे बद्दल माहिती असलेल्या व्यक्तीने हे करून द्यावे. थोडे अधिक पैसे द्यायची माझी तयारी आहेच. सेवेला मोल असावेच. शिवाय बिझनेस नेटवर्क मधील मेंबर असल्याने जरा अधिक विश्वसार्हता वगैरे.

मी भरपूर वेळ हातात ठेवून वगैरे संपर्क केला, वेळोवेळी रिमाइंड केले. उत्तर “झालय हो, टेन्शन नका घेवू” हे पालुपद. शेवट अगदी प्रवासाच्या २-३ दिवस आधी १०० टक्के आगावू रक्कम भरून हॉटेल रूम बुक केली. दुर्दैवाने मी आजारी पडल्याने रद्द करावे लागणार असे दिसले. सदर व्यक्तीला हे सांगताच ताबडतोब उत्तर “पैसे परत मिळत नाहीत एक दिवस अगोदर रद्द केले तर” ! 

एकतर दोन दिवस होते हातात. किमान प्रयत्न करणे आणि त्याचे आश्वासन देणे तरी निश्चित शक्य होतच. बाकी काही असो, पण मला हा 

कायमच प्रश्न सतावत आलेला आहे … की आपण जे काम करत असतो ना, अगदी कोणतेही, ते कुणा तरी करिता असते नाही का ? 

म्हणजे असं… की तो जो … ज्याच्या करिता हा खटाटोप मांडलेला असतो, त्यालाच खोडून काढल्यासारखे झाले ना हे. तेही सेवा व्यवसाय !

शिवाय, बिझनेस नेटवर्क, जिथे फक्त एकमेकांच्या ओळखींचा व्यापार असतो, तिथे तर हे फार घातक ठरू शकते, नाही का ?

पूर्वी माझे एक मशीनरी चे पुरवठादार होते. माझा व्यवसाय मार्केटिंग करून मागण्या मिळविणे व जी मंडळी ती मशीन्स तयार करतात त्यांच्याकडून तयार करून घेवून ती पुरवणे ह्या प्रकारचा होता. तर कधी कधी ह्या पुरवठा दारांकडून वेळोवेळी विविध मशिनरीची वेगवेगळ्या ( म्हणजे मशीन तेच असेल, परंतु समोरून त्या मशीनकडून ईप्सित कार्य बदलले की मॉडल मध्ये बारीक बदल होत असे. ) किंमतपत्रकांची गरज भासायची. त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडून ही किंमत पत्रके पुन्हा पुन्हा घेत असू. बरेच लोक द्यायचे सुद्धा. मान्य, की कधी कधी माझ्याकडून सुद्धा पूर्वी मागितलेले किंमतपत्रक पुन्हा मागविले गेले असावे. तरी मलाही भान होतेच की ! पण माझ्या ह्या मित्राने मात्र मला खणखणीत सांगून टाकले “आता ह्यापुढे मी तुम्हाला कोणतेही कोटेशन देणार नाही” 

एक दुसरा पुरवठादार होता, तो म्हणाला : “तुम्ही नुसतीच कोटेशन्स घेत राहता. ऑर्डर तर कधीच देत नाही !” 

ह्या दोघांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल मला नक्कीच आदर वाटतो. पण आपला उदरनिर्वाह हा वेळ विकून होत नाही ( आपण नोकरदार नाही ). ह्या अर्थी आपण सांगत आहोत की “अमुक आमच्याकडे आहे , तर ते तुम्ही घ्या”. मग समोरून विचारणा होणार. तर ह्याच मूलभूत संकल्पनेला छेद दिल्यासारखं झालं ना हे.


ह्या उलट एक व्यक्ती म्हणाली तीन वेळा नाही तीनशे वेळा विचारा सर. मी देतच राहीन. ह्या व्यक्तीशी पुढे घनिष्ठ मैत्री झाली. गुज्जू भाई. त्याचं म्हणणं : सुरुवातीला तुझ्याकडून जास्त प्रश्न येतील. हळूहळू कमी होतील.पण तू ट्रेन झालास की मला तुझ्याचकडून भरपूर धंदा येईल ना बाबा ! 


उगाच नाही लोक गुजराथी मंडळींकडून धंदा शिकत !

Saturday, 11 October 2025

उद्योगाचे पुढील पिढीत यशस्वी संक्रमण !

निवडक उद्यमी चे पूर्वापार सदस्य आहेत, त्यापैकी डॉ राजूरकर हे एक सदस्य. परभणी मध्ये त्यांचा L R Pharmaceuticals हा उद्योग गेली २५ वर्षे उभा आहे, आणि विशेष म्हणजे पुढच्या पिढीत आता संक्रमित देखील झालाय. नुकतीच निवडक उद्यमी च्या काही मंडळींनी त्यांच्या उद्योगास भेट दिली, त्याबद्दल वृत्तांत :-



निमित्त होते, निवडक च्या त्रैमासिक बैठका. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू. तर गेल्या महिनाभरापासून हे सुनियोजित आणि तरीही कोणत्याही प्रकारच्या ताणविरहित पार पडले. एकत्र प्रवास केल्याने संबंध, मैत्री अधिक घट्ट झाली. ३ तारखेला निघून ४ तारखेला परभणी ला पोचलो आणि पाठोपाठ L R Pharma येथे सकाळी आलो.



आधी एक सादरीकरण झाले. त्यात डॉक्टर स्वत: व सोबत त्यांचे दोन्ही चिरंजीव, स्नुषा तसेच तिसरी पिढी ( नातू ) ह्यांचाही सहभाग होता.











संध्याकाळी ( रात्री ) ऐसपैस निवांत क्षणांत गप्पा अधिक खुलल्या, रंगल्या. डॉ स्वत: Veternary Medicine ह्या क्षेत्रात अत्यंत सन्माननीय आहेतच, शिवाय जनावरांची आयुर्वेदिक औषधे ह्या क्षेत्रात बहुधा एकमेव असावेत. सरांचे अनेक प्रबंध, पुस्तके इत्यादी क्षेत्रात प्रचलित आहेत. 



त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून ज्येष्ठ चिरंजीव हा देखील "डॉक्टर सौरभ" आहे, जो आता कनिष्ठ चिरंजीव सिद्धांत, जो एका प्रथितयश संस्थेतून व्यवस्थापन शिकून तयार होवून आलाय. ह्या दोघांनी स्वेच्छेने कुटुंबाच्या उद्योगात प्रवेश केलाय, ढकललेले नाही, हे विशेष. स्नुषा कल्याणी ही कंपनीच्या उद्योगाचे दर्जा नियंत्रण पाहते, स्वत: उच्च विद्या विभूषित आहे, तर आता ही पिढी सध्याच्या उत्पादन कारखान्याव्यातिरिक्त आता अजून एक कारखाना अशी मोठी झेप घेत आहेत, सोबत एक अत्याधुनिक प्रयोगशाळा सेट अप असाही मोठ्ठा मानस आहे. 

दुसऱ्या दिवशी ह्याला जोडून निवडक ने थोडे पर्यटन केले :-




दुसऱ्या दिवशी सर्व सकाळी पुनश्च मुक्कामी आलो. आता पुढची त्रैमासिक भेट जानेवारीत असेल. ह्या भेटींचे कारण असे आहे, कि आपण एकमेकांचे संचालक मंडळ. तीन महिन्यांचा अहवाल आकड्यांच्या स्वरूपात सादर करायचा आणि अपेक्षित परिणाम साधायचा.

Thursday, 2 October 2025

संधी इथेच आहे !

निर्यात म्हणजे तसं पाहता काय असतं वेगळं ? इथे जवळ काही वस्तू पाठवायच्या ऐवजी लांब पाठवायची. लहान गोष्टी पाठवताना तर ही कटकटच वाटते,नाही का ? 

उदा. कुणी खाद्य पदार्थ तयार करतय तर लांब  म्हटलं की जरा जीवावरच येतं. 

इतकं आणि इतकंच साधं ठेवलं ना आपण, म्हणजे त्या so called "export" चा गरिमा काढून टाकला की मग आपण प्रत्यक्ष, सहज विचार करू लागतो, त्याला प्रवृत्त होतो.

उदा. नुकताच मी मध्यपूर्वेच्या देशांत जाऊन आलो. काही काम मिळाले होते. तर पाठोपाठ, सवयीने तिथेच पुढे काय संधी त्याकरता पुन्हा एक प्रदर्शन असेल त्याला जावे का, वगैरे महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात मन गुंतू लागलं. 


तरी पुढची कोणतीही पावले उचलण्या पूर्वी काही गोष्टी विचारत घेणे योग्य, जसे की 

जे काम तिकडे निर्यात करू पाहतोय,त्याला इथेच खूप मागणी आहे ना !
कधी तरी येणाऱ्या spikes वर संपूर्ण रणनीती आखणे पूर्ण चूक
तिथेही ( आखाती देशांत ) त्यांना scale up करणे ही मोठी समस्या भेडसावते, जी आपल्याकडे अजिबात नाहीये.
मान्य की आपल्याकडे जरा गोंधळ आहेत, पण त्यातच अमाप संधीही आहेत.

सरतेशेवटी एवढेच म्हणायचे आहे,की इथेच आपल्याला आपले काम देऊ करण्यासाठी वाव असेल, तर परदेशी काम करू नये असे नाही, पण वाट पहावी, रणनीती आपल्याच करता आखावी. 

सध्याच्या अमेरिकी आयातशुल्क प्रकरणाने अनेक दिग्गज मंडळींना जागेवर आणले असेलच !

Friday, 5 September 2025

GST शिथिलीकरण : एक धोरणात्मक पाऊल

आपले धोरण म्हणून जेव्हा काही कृती आपण करत जातो, तेव्हा आपोआपच येणाऱ्या संधीना सामोरे जाताना ताण न येता त्या हाताळल्या जातात. धोरणात्मक विकास, आपल्या व्यवसायाचा देखील, हा पायरी पायरीने होत जातो, आणि आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचत जातो, आणि हे सर्व अतिरिक्त ताण न येता होऊ लागतं.

नुकताच झालेला GST मधील बदल सुद्धा ह्याच परिप्येक्षातून पाहता येईल."आत्मनिर्भर भारत" ही भारताची अगदी प्रथमपासूनच भूमिका राहिली आहे. पूर्वीपासून ह्याच संकल्पनेचा नक्कीच आधार घेऊन ह्याकडे वाटचाल सुरू होती. त्यामुळेच २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या GST मध्ये काळानुरूप सुधारणा व सुसूत्रीकरण होणारच. गेल्या वर्षापासूनच अंतर्गत मागणी कमी होणे ही समस्या आपली अर्थव्यवस्था फेस करतच होती. त्यात अमेरिकेच्या तात्पुरत्या का होईना पण एकतर्फी आयात शुल्क प्रकरणामुळे ह्यात काहीतरी करणे भाग होते. गेल्या काही तिमाही ( ट्रम्प प्रकरणाच्या पूर्वी पासून ) सततचा कमी होणारा रेपो दर, MSME ना प्रेरक अशा कर्ज मोहिमा हेच सूचित करत आहेत. अमेरिकी नियमाने ह्याला एक निश्चित पाऊल, लगेच घ्यायला उद्युक्त केले.

पण आपण हे आधीपासूनच करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. कदाचित आपल्या देशाची वाढू लागलेली आर्थिक आणि एकंदरीत ताकद पाहून ट्रम्प महाशय व्यथित झाले आणि काहीतरी कारण काढून ह्या प्रति अमेरिका होऊ पाहणाऱ्या समीकरणांना आळा घालण्यासाठी त्यांनी फक्त भारतावर कडक निर्बंध लागू केलेत. 

आपल्या सरकारने चीन प्रमाणे कोणतीही आततायी कृती न करता, एक सुरक्षित अंतर ठेवून प्रतिसाद दिलाय. आणि आत्मनिर्भरते कडे अधिक जोमाने, आणि विश्वासाने आगेकूच सुरू केली आहे, आणि आपण हे सर्व करायला आधीपासून तयार आहोत. 

सोपे नसले,तरी अवघड नक्कीच नाही. आपल्या भारत देशाच्या आता पर्यंत असणाऱ्या सर्व नेत्यांचं असलेलं सामाजिक भान ह्याला ह्याचं सर्व श्रेय जातं. मुळात तीनशे चारशे वर्षा पूर्वी अस्तित्वात आलेल्या देशाची उथळ विचारसरणी विरुद्ध १.५ ते दोन हजार वर्षे नक्की इतिहास ठावूक असलेल्या एका उपखंडाची संस्कृती ही सर्व आव्हाने हाताळायला सज्ज आहेच.

हे सर्व वृथा अभिमान म्हणून प्रतिपादित होत नाहीये, पण वृथा भीती सुद्धा नको. आहोत आपण समर्थ, घेऊ सांभाळून !