Tuesday, 15 July 2025

उद्दिष्टाचे स्मरण : प्रगल्भतेचे मानक

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात काल भारताची हार. बरंच शिकण्यासारखं. दोन्ही संघांकडून.

मला वाटलं, मी धुतलं 
यशस्वी जयस्वाल, हॅरी ब्रूक, ऋषभ पंत ह्यांनी संघाचा काहीही विचार न करता मनाला येईल तसा फटका मारला आणि आऊट झाले. ते ते चेंडू सर्वोत्कृष्ट नव्हते. काहीच नाही. आली सनक, हाणा.... मागचा पुढचा विचार शून्य. 

बाचाबाची अर्थात स्लेजिंग 
इंग्लंड सारखे संघ अगदी आधीपासून हे करतातच. मला आठवतं एकदा गावस्कर आणि एकदा अरविंद डिसिल्वा ह्याबद्दल बोलले होते, की ह्याकडे दुर्लक्ष करणे हे किती महत्त्वाचे आहे. कशासाठी ? स्वतः ची एकाग्रता ढळू न देण्यासाठी. पर्यायाने संघासाठीच. ह्याउलट शुभमन गिल ह्याने स्वतः भांडभांड केली. इथेच त्याची स्वतः ची एकाग्रता ढळली. 

फक्त उभं राहायचं होतं 

रेड्डी, बुमरा,सिराज, राहुल आणि दस्तुरखुद्द जाडेजा ह्यांना जे जमलं ते बाकीच्यांनी का बरं करू शकू नये ? जेफ्री बॉयकॉट च्या म्हणण्यानुसार "तासनतास उभे राहून अजिबात फटका मारण्याचं टाळणे" हे एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे ( क्रिकेट मध्ये ) आणि कौशल्य आहे ( व्यवसायात ).

तिकडे विंडीज आऊट झाले फक्त २७ धावांत ! कारणे : हीच, अशीच. अजून काय !

अंतिम उद्दिष्ट काय ?

ह्याचे थोडे जरी स्मरण असते, तरी अशा चुका घडल्या नसत्या. संयम का ? तर अंतिम उद्दिष्टकरिता. सामन्यात विजय. मनात आलेले फटके मारण्यासाठी अख्खा दिवस होता ना पडलेला.

अशाच चुका आपल्या व्यवसायात होत असतात. अशा वेळी अपेक्षित संधीचे नीट मूल्यमापन करून मगच त्यात शिरावे. कधी कधी "नाही" म्हणायला देखील हरकत नसते.

Thursday, 10 July 2025

व्यावसायिक हा प्रथम एक गुंतवणूकदार असतो

ज्याप्रमाणे शेअर बाजारातील कंपन्या फार विश्वासार्ह नाहीत , असं आपण म्हणत असतो, आता हाच नियम आपल्या सरकार बाबत सुद्धा लागू होऊ शकतो. 

अगदी ताजं उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा. 
अनेक वर्षे याचा सगळीकडून प्रचार केला जातो आहे. सोबत अनेक कंपन्या तसेच उद्योजक यांना देखील हे क्षेत्र खुणावत आहे. अनेक लघु आणि अति लघु उद्योजक मंडळी याच्यावर शंभर टक्के अवलंबून आहेत. ही तुमच्या माझ्यासारखी मंडळी याचा प्रसार करून स्वतःचं अर्थार्जन स्वतःच करू पाहणारे खरे मुळातले उद्योजक. ही मंडळी विविध ठिकाणहून सौरऊर्जेचा प्रचार करत असतात आणि यात प्रमुख मुद्दा असतो तो म्हणजे वीज बचतीचा. याला नक्कीच मोठं मार्केट आहे. आणि त्यामुळेच तितकीच स्पर्धा सुद्धा आहे. 

बाजाराच्या नियमाप्रमाणे स्पर्धा वाढली की नफा आकसतो. तरीही उद्योजक मंडळी मावळ्यांप्रमाणे खिंड लढवत असतात. सतत आशेवर आणि दुर्दम्य इच्छाशक्ती वर ही मंडळी लढत असतात. 

पण मध्येच एखादा मोठा घाव येतो आणि भविष्य धूसर होऊन जातं. अशावेळी अनेक मंडळी मानसिक रित्या ढासळतात. आणि स्वाभाविक देखील आहे. अगदी पहेलगाम सारखी अनपेक्षित घटना घडली तर तसं काही फार करता येत नाही, सरकारवरचा विश्वास देखील उडत नाही. परंतु नुकतीच महाराष्ट्र वीज मंडळाने जाहीर केलेला सौर ऊर्जेबाबतचा नियम म्हणजे अजबच म्हणायला हवा. थोडक्यात सांगायचं तर ज्या उद्देशाने मोठे उद्योजक किंवा लहान सहान कारखानदार बऱ्यापैकी गुंतवणूक करून ज्या आशेवर तो परतावा मिळण्याची अपेक्षा करत असतात त्यावरच घाला घातला गेलेला आहे. 

एकच दणका 

म्हणे, आता 24 तास सौरऊर्जेचा मोबदला म्हणून वीज मंडळाची वीज मिळणार नाही. याचा अर्थ असा की फक्त आठच तास त्या बदल्यात असलेली वीज मिळणार. उरलेले सोळा तास वीज मंडळाच्या राक्षसी दराने वीज खरेदी करावी लागणार. शिवाय जेव्हा कारखाना बंद असेल तेव्हा जी काही युनिट्स गोळा होत होती, त्याचा परतावा देखील मिळणे थोडे मुश्किल होऊन बसले आहे. एखादा सौरऊर्जा तज्ञ याबद्दल त्यांचे मत देईलच. परंतु या निमित्ताने सरकार हे देखील अत्यंत बे भरवशाचे आहे हे सिद्ध होऊ लागले आहे. 

खाजगीत तर असे वरचेवर होत असते 

मला आणि इतर अनेक लहान उद्योजकांना हा वारंवार अनुभव येत असतोच की काम संपलं की ज्या संस्थेंसोबत आपण काम सुरू केलं आहे किंवा होतं त्या आपल्याला वाऱ्यावर सोडतात. यात फार तपशीलात जाण्यात अर्थ नाही. 

आज गुरुपौर्णिमा आणि त्या निमित्ताने अनुभव हा आपला कायमस्वरूपी गुरू तो आपल्याला काय शिकवतो हे अधिक महत्त्वाचं. 

यातून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे की कुणीच विश्वासार्ह नाही ही वस्तुस्थिती स्वीकारणे. आणि उद्योजक हा प्रथम गुंतवणूकदार आहे ही अधिक व्यापक दृष्टी विकसित करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

आपल्या व्यवसायाचा सुद्धा आपण अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय असाच विचार करायला हवा. आपण एकच व्यवसाय घेऊन बसतो आणि त्यात वर खाली झाले की दुःख करत बसतो. असे न करता आपण अनेक ठिकाणी आपली गुंतवणूक विखुरणे गरजेचे आहे. शेअर बाजार आपल्याला ही संधी देतोच. स्वतः अभ्यास करून हे करता येईलच, परंतु ह्या विचाराला केंद्रस्थानी धरून बाकीचे विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. 

म्हणजे करायचे काय ?

गुंतवणूक हा आपला स्थायीभाव ठेवला तर परतावा हा त्यातला परिणाम. कोणत्याही गोष्टींनी उमटणारे पडसाद हे काहींसाठी योग्य असतात तर काहींसाठी अयोग्य. शेअर बाजार आपल्याला अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये अगदी कमीत कमी गुंतवणूक करून आपली गुंतवणूक समतोल करण्याची बहुमूल्य संधी देतो. अनेक लोक हे एसआयपी किंवा थेट रोख्यांमध्ये गुंतवणे ह्या मार्गाने हे करतच असतात. गरज आहे ती या मार्गाकडे प्रमुख मार्ग म्हणून पाहण्याची. 

जब जाग आए वही सवेरा 

"माझं वय फार झालंय", किंवा 
"मी अगदीच तरुण आहे", 
"आत्ता कुठे करिअरला सुरुवात केली आहे",
तत्सम कारणे मनाला देत बसू नका. ज्या क्षणी हे उमगलय त्या क्षणी कामाला सुरुवात करा. 

एखाद दोन पुस्तके वाचा, काही कोर्सेस वगैरे अटेंड करा. खूप पैसे भसकन गुंतवू नका. त्याऐवजी अशा कोर्सेस किंवा शिकण्यामध्ये थोडे जास्त पैसे गेले तरी चालेल. काही ठिकाणी खूप चांगले काही मिळेल, काही ठिकाणी तितकेसे मिळाले नाही असे देखील वाटेल. परंतु एकदम अंधविश्वासाने किंवा कमी ज्ञानाने हे सुरू करू नका. 

यालाच आजपासून सुरुवात करूया.

Monday, 7 July 2025

Operations चे असाधारण महत्त्व ....

माझा मित्र निशांत ह्याने नुकताच राजीव तलरेजा ह्यांच्या मुलाखतीची एक लिंक मला पाठविली होती. त्यात मला आवडलेले आणि खूप भावलेले एक वाक्य म्हणजे :-

सध्याच्या युगात आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल, तर आपली Operational Efficiency वाढवूनच हे शक्य होईल. उत्पादने, सेवा वगैरे तर प्रत्येक संस्था उत्तमोत्तम देण्यात कुठे कुचराई नाही करत.

✔ पटण्यासारखे आहे. माझ्या कडे सध्या काही अशी उदाहरणे (लहान व्यवसायांची) आहेत की त्यांना वाटत राहते कि फक्त विक्री हेच सर्वस्व. 

मला एका संस्थेने त्यांच्याकडील निवडक अशा १२ उद्योजकांबद्दल टिप्पणी द्यायला सांगितले, आणि सोबत एक एक्सेल sheet दिला ज्यात बरेच मुद्दे होते मूल्यांकना करिता. एक होता : Net Profit अर्थात निव्वळ नफा. त्यात १२ पैकी फक्त एकाचाच निव्वळ नफा ८% पेक्षा जास्त होता. बहुतेकांचे १- ३ टक्के. मी विनंती करून त्यांच्या "कार्यचालन म्हणजेच Operating Profit" चे आकडे मागवून घेतले. मग सर्व जरा बरे झाले. बऱ्याचदा नफा कमी दाखवून कर कमी भरण्याच्या प्रवृत्तीने असे होत असावे. तरीही, मी माझा निष्कर्ष पाठवून दिला :- ज्या उद्योजकांचा कार्य चालन नफा हा १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, त्यांचाच विचार व्हावा. कारण निकष अगदी काहीही जरी असला, तरीही आपल्या स्वत: च्या मूळ कामातून जे उद्योजक कमीत कमी १५ टक्के नफा मिळवू शकत नसतील, तर बाकी सर्व गौण. खालील एका कंपनीच्या उदाहरणातून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय.

आजच्याच सकाळ मध्ये योगा योगाने डॉ अनिल लांबा ह्यांचे एक विधान आले आहे जे Cash Flow किती महत्त्वाचा आहे ह्याबद्दल आहे 👇


✵पाठोपाठ श्री भूषण ओक ह्यांचे एका कंपनीचे (Dynacons) आर्थिक विश्लेषण आलेले आहे. त्यातील बाकी सर्व भाग सोडा परंतु, खालील दोन्ही वक्तव्ये पहा :-



दोन्हींमध्ये " Cash In" जरा चिंताजनक बाब आहे असे म्हटलेले आहे. म्हणजे येणी आहेत, परंतु वसुली मात्र ३५ टक्केच आहे. आता आणखी खोलात गेल्यावर समजून आले, की , कदाचित कंपनीच्या प्रत्यक्ष धंद्यातून असलेल्या येण्याचे प्रमाण इतके कमी नसेल, परंतु कंपनीने सोबत इतर गुंतवणुकी केल्यात ज्यात कदाचित घाटा झाला असावा.कुठेतरी कंपनी व्यवस्थापनात गडबड असू शकते. तर ही इतर गुंतवणूक कार्य चालन नफ्यातून केली जाते ना ! म्हणूनच एखाद्या कंपनीची कामगिरी पाहताना ताळेबंद, नफा तोटा पत्रक व सोबत कॅश फ्लो देखील पाहतात. हे कॅश फ्लो सुद्धा ३ भागांत असतात : त्यातील Operations Cash Flow नीट बघितला कि कंपनीचे कामकाज समजून येते.

मी काही यातला कसलेला खेळाडू नाही, फक्त सोबत स्वत: चा व्यवसाय व इतर व्यावसायिकांशी सल्ला मसलत करत असताना, त्यांच्या समस्या अधिक खोलात जाणून घ्यायला, त्या नीट अधोरेखित करायला ह्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करीत आहे.

इथे आपण कंपनीचे शेअर घ्यावे कि नाही ही चर्चा नाही करत आहोत, परंतु ह्या अनुषंगे आपल्याला निश्चित समजून येतं की Operational Profit किती महत्त्वाचा आहे. हाच तो EBITDA. ह्यावर आपला एक विशेष podcast देखील आहे. 

✔ नुसता कागदावर नफा दिसून नाही भागायचे तर तो रोखीत , वेळेत रुपांतरीत व्हायला हवा. नाहीतर गणित पालटायला वेळ लागणार नाही. ह्याकरिता वेळेवर वसुली होणे, प्रत्येक ठिकाणच्या नोंदी अचूक तसेच वेळेवर चोख व्यायला हव्यात. नसल्यास कर्मचारी वर्गास समजूत द्यायला हवी. कंपनीत कार्यचालन नफ्याची संस्कृती रुजवायला हवी. कर्मचारी वर्गाला ह्यात प्रशिक्षित करायला हवे.


 

Saturday, 28 June 2025

सेवा - बीवा

काही प्रसिद्ध online व्यवसायांच्या "ग्राहक - सेवा" 

नुकतंच अमेझॉन वरून एक पार्सल ऑर्डर केलं. TDS मीटर+ PH Meter असे होते. अमेझॉन प्राईम असल्याने २ दिवसांत मिळणार होते. ज्या दिवशी यायचे त्याच दिवशी संध्याकाळी संदेश : आज नाही, दोन दिवस लागतील. दोन दिवस वाट पाहिली. पुन्हा सायंकाळी संदेश : आम्हीं म्हणे तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला, तुमच्या पर्यंत पोचता नाही आले, त्यामुळे दोन दिवस अजून लागणार.

ह्यांच्याकडे chat पटकन उपलब्ध नाही, फोन विषयच नाही. महत्प्रयासाने chat सापडले माणूस एकदम प्रॉम्प्ट पण प्रचंड मठ्ठ आणि अत्यंत फालतू स्मार्ट. त्याने अजिबात किती वाजता पार्सल मिळेल हे सांगितले नाही. आजही ( ८ पर्यंत देणार होता ) आलेले नाहीच. मी ऑर्डर रद्द केली. पुन्हा ह्या लोकांचा अभिप्रायाचा ठराविक स्क्रीन. माझ्या गरजेचं काय ? तपासच नाही.

असाच अनुभव axis च्या  क्रेडिट कार्ड कडून. काही केल्या ही मठ्ठ मंडळी स्टेटमेंट इमेल ने पाठवायला तयारच नाहीत. हद्द झाली यार.

ह्यांना तुमची काहीच पडलेली नाही.

इंडिया मार्ट :- इथे तर साधा सर्च करायची प्रचंड भीती वाटते. भयानक फॉलो अप सुरू होतो. आणि फीडबॅक वर फीडबॅक. साधं संभाषण कसं झालं ह्याचा सुद्धा प्रचंड फीडबॅक फॉलोअप. मूर्खपणाचा कळस.

सर्वात विनोद म्हणजे अमेझॉन च्या फीडबॅक फॉर्म वरचा empathy नामक एक पर्याय. 

काय बोलायचं आता ?

पूर्वी मशिनरी चे काम करताना ACC ह्या tata समूहातील बलाढ्य कंपनीने माझ्यासारख्या अती लघु उद्योगाला काम दिले होते. जैन नामक व्यक्तीने हे काम मोठ्या कंपनीला डावलून मला दिले ह्याबद्दल आश्चर्य वाटून मी त्यांना विचारले होते, तेव्हा त्याचं उत्तर ऐकण्याजोगे होते :-

" बडे कंपनी के सपोर्ट को पकड़ना मुश्किल होता है , छोटा पकड़ में आ जाता हैं "

Friday, 27 June 2025

आत्मसन्मान हीच खरी ऊर्जा

उद्योग व्यवसायात आपले उत्पादन, सेवा ह्या सुचणे, त्यांना एक व्यावसायिक विक्रीयोग्य रुप देणे, पाठोपाठ त्यांविषयी सतत सांगत राहणे हेही काम असते. म्हणजे काय तर त्यांचे कायमस्वरूपी दालन प्रत्यक्ष दुकान किंवा आंतरजालावर प्रस्थापित संकेतस्थळ तयार करणे ( किंबहुना दोन्हीही ). 

आणि नंतर ते अनेक ठिकाणी : अशी ठिकाणे, जी गप्पा मारण्यासाठी तयार करण्यात आलेली असतात जसे की इंस्टाग्राम वगैरे; किंवा अशी ठिकाणे की जिथून प्रत्यक्ष खरेदी करण्याच्या उद्देशाने व्यक्ती येतात, म्हणजेच बाजार  (जसे की अमेझॉन, जस्ट डायल, इंडिया मार्ट इत्यादी ); तर काही अशीही ठिकाणे की जिथे व्यक्ती त्यांच्या संगणक अथवा भ्रमण ध्वनी मार्फत शोध करतात ( जसे की गुगल ) अशा ठिकाणी पोस्ट करणे.

अजूनही इतर मार्ग आहेतच. इथे विषय भटकायला नको म्हणून थांबवतो,कारण चर्चा ह्या मार्गांची नाही, तर एक उद्यमी ला कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल बोलायचं आहे. 

उद्यमी:- मग ती व्यक्ती स्वतः चे काहीतरी असे करू पाहतेय की ज्याद्वारे तिचे अर्थार्जन त्याद्वारे होईल, दुसऱ्या कुणाची चाकरी न करता.
हा प्रवास सुरू असताना काही व्यक्ती, संस्थांच्या संपर्कात येतात, तिथे काही "महत्त्वाच्या" वगैरे व्यक्ती असतात, म्हणजे काय तर व्यवस्थेने त्यांना दिलेले पद. तर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा उद्यमी सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी मनाविरुद्ध जाणे, विनंत्या करत राहणे हा प्रवास बऱ्याच ना इलाजस्ताव ती व्यक्ती करत असते, राहते. कृत्रिमरीत्या आवडून घेऊन करत राहते. काही व्यक्ती ह्या कृत्रिमरीत्या मुरवून घेतलेल्या कौशल्याला सरावतात. काहींमध्ये अजिबात हे शिरत नाही. काही लोक कधी कधी हे जमवून घेतात, तर कधी कधी अजिबात झेपत नाही त्यांना.

हीच शिदोरी पुढे कामी येणार 

कधी कधी मला स्वतः ला देखील स्वतः बाबत हा अनुभव येतो,येत असतो. 

"तुझं हेच चुकतं"
"थोडी आणखी कळ काढली असतीस तर.."

असे आप्तस्वकीय मंडळींचे ताशेरे, किंवा 

"त्याने बघ कसं पुढे - पुढे करून बरोब्बर पदरात दान पाडून घेतलं"
"आपलं प्रोफाईल नाय ना यार तसं

ह्या स्वरूपाची किंचित असूया, खेद मिश्रित वल्गना ( स्वतः ची )

अशा अनेक मनो प्रवासातून मी गेलोय,जात असतो. मला खरं तर ह्यातून मुक्त व्हायचं असतं ( हेही आत्ता आत्ता म्हणजे साठी ला  आल्यावर उमगलेले नव सत्य ). तर मला ह्यातून एक गोष्ट सुचली ती म्हणजे :- 

एका प्रमाणाबाहेर आपण हे नाही सहन करू शकत. आणि नाही करायचं. कधी कधी ते so called पदस्थ आपल्याला बऱ्यापैकी दुर्लक्षित करतात अशी जाणीव झाली आणि माझी अशी काही कृती झाली की त्यातून प्राप्त होऊ शकणाऱ्या संभाव्य लाभाला घातक होती ( हे नंतरच जाणवतं) , तर सर्वप्रथम स्वतः बद्दल योग्य वाटून घ्यायचं, अजिबात खंत किंवा अपराधी वगैरे वाटून घ्यायचे नाही , कारण आपण आपल्या आत्मसन्मानाची कदर केली, त्याकडे आलो की विश्रामाची भावना जागृत होते.

हीच शिदोरी पुढे कामी येणार !



Thursday, 19 June 2025

खरंच मराठी उद्योजक घडवायचे आहेत?

मी काही नेटवर्क चा सदस्य आहे अनेक वर्षे. इथे व्यावसायिक मंडळी कोट घालून भेटतात. ह्या गोष्टीला अनेक जण नाके मुरडतात.

असेच मग सर्व साधारणपणे मराठी भाषा वापरताना , खास करून सरकार दरबारी , अत्यंत जड शब्द वापरले जातात. शब्दाला शब्द असा अतिरेकी आग्रह सोडल्यास नक्कीच बरं होईल, शिवाय प्रत्येक ठिकाणी मूळ इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द असायलाच हवा असं नाही ना ! 

तरीही प्रत्येक ठिकाणी, अगदी साधे साधे लिहायचे, बोलायचे झाले तरी इंग्रजी चा वापर का बरं ?

अजून एक म्हणजे :- हे कोणी सांगितले की मुलाना इंग्रजी शाळेतच घाला ? इथे मराठीचा दुस्वास करायचा, तिला निष्कारण कमी लेखायचं आणि मराठी उद्योजक घडवायचे !

आशेचा किरण 

नवीन शैक्षणिक धोरण मात्र आशादायक आहे. 
प्राथमिक वर्षांत तरी सरकारने मातृभाषा प्रमाण ठेवली आहे ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन

Monday, 9 June 2025

कर्मचाऱ्यांत खरी passion निर्माण करणारा उद्योजक

उद्योग जगतातील अवलिया हे लिहिणारे रिकार्डो सेमलर ही तसे पाहता जन्मजात धनवान व्यक्ती, ज्यांच्या वडिलांनी मशिनरी उद्योग निर्माण करून मोठा केला. रिकार्डो नी अगदीच लहान वयात ही जबाबदारी पुढे पेलली.

विशेष हे , की त्यांनी सर्व ढाचा, ज्या पारंपरिक पद्धतीने कंपन्या चालवल्या जातात, त्या त्रिशंकू व्यवस्थापनाला तोडून मोडून, कंपनी ही "मनुष्य" केंद्री केली. आणि प्रचंड यशस्वी करून दाखविली. 

भारताप्रमाणे ब्राझील मध्येही ट्रॅफिक, गर्दी इत्यादी समस्या आहेतच. त्यात लवचिक वेळा, स्वतः च स्वतः चे उत्पन्न ठरवणे, आपले ऑडिट आपल्या कनिष्ठ मंडळींकडून  करून घेणे, कर्मचारी मंडळीना नफ्यात भागीदार करून घेणे, ह्यामुळे त्यांना अपेक्षित तो परिणाम त्यांना लाभला :- सकाळी अत्यंत प्रेरित होऊन कामाला आतुर असलेला कर्मचारी वर्ग.

तरीही सर्व काही लोकशाही पद्धतीने व्हायलाच हवे असा त्यांचा दुराग्रह नाही. काही युनिट्स अगदी लष्करी खाक्याने देखील चालत आहेत त्यांची. कारण मुळात "माणूस" समजून घेतलेला आहे.

निरुपयोगी मेट्रिक्स काढून टाकणं, मशीन असेम्ब्ली करिता पट्टे नसणे, अनावश्यक कागदपत्रे टाळून एक पानी टाचणे, तसेच कर्मचाऱ्यांची ठोकळबाज उतरंड काढून टाकून नवी लहानशी कंट्रोल युनिट्स तसेच मला सर्वात भारी वाटलेली म्हणजे अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना त्यांनी राबविलेली उपग्रह उद्योग उपक्रम व्यवस्था. अर्थात कर्मचाऱ्यांना कंपनीचे भाग सप्लाय करण्याकरिता मदत, शिक्षण , तसेच संपूर्ण सहकार्य. अचंबित करणारे आहे सर्व.

काही वाक्यं मला खूप वेगळी वाटली ती खाली देत आहे :-
  • मिनिटा मिनिटाचा हिशोब ठेवणाऱ्या ला जीवनाची संकीर्णता समजूच शकणार नाही 
  • जेव्हा मी काहीच करत नसतो तेव्हा मी अतिशय कार्यकुशल असतो
  • जे निर्णयाचे परिणाम भोगणार आहेत त्यांच्यावर निर्णय सोडणे
  • तपशिलाचा चिखल
  • माहिती गोळा करायचा हव्यास
  • जेव्हा मी अर्धा दिवस, घरून काम करायचं ठरवलं तेव्हा सर्वांना वाटलं की मालकाचा मुलगा, आराम मिळावा म्हणून बहाणा करत असेल. त्यांची ही शंका दूर करण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न मी केले नाहीत.
  • माझी गरज आहे अशी परिस्थिती निर्माण होणं ही लाज आणणारी गोष्ट आहे
आणि अशी अनंत वाक्ये.

केळकरांनी देखील अगदी छान मराठीत वाक्ये वापरून अनुवाद करण्याचा यत्न केलाय. 

इतर अनेक अनेक अनुवादित साहित्या प्रमाणे ह्यातही मूळ इंग्रजी आहे ते प्रसंगी फोड करून, विलग करून आणि सोपे करून न सांगितल्याने अर्थ समजायला खूप अवघड जातं.

पण ते अगदीच माफ. कारण असे पुस्तक मराठीत आणणे ही कल्पना सुचणे, ते प्रत्यक्षात करणे ह्या सर्वकारिता केळकर : आपले आभार.