अगदी ताजं उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा.
अनेक वर्षे याचा सगळीकडून प्रचार केला जातो आहे. सोबत अनेक कंपन्या तसेच उद्योजक यांना देखील हे क्षेत्र खुणावत आहे. अनेक लघु आणि अति लघु उद्योजक मंडळी याच्यावर शंभर टक्के अवलंबून आहेत. ही तुमच्या माझ्यासारखी मंडळी याचा प्रसार करून स्वतःचं अर्थार्जन स्वतःच करू पाहणारे खरे मुळातले उद्योजक. ही मंडळी विविध ठिकाणहून सौरऊर्जेचा प्रचार करत असतात आणि यात प्रमुख मुद्दा असतो तो म्हणजे वीज बचतीचा. याला नक्कीच मोठं मार्केट आहे. आणि त्यामुळेच तितकीच स्पर्धा सुद्धा आहे.
बाजाराच्या नियमाप्रमाणे स्पर्धा वाढली की नफा आकसतो. तरीही उद्योजक मंडळी मावळ्यांप्रमाणे खिंड लढवत असतात. सतत आशेवर आणि दुर्दम्य इच्छाशक्ती वर ही मंडळी लढत असतात.
पण मध्येच एखादा मोठा घाव येतो आणि भविष्य धूसर होऊन जातं. अशावेळी अनेक मंडळी मानसिक रित्या ढासळतात. आणि स्वाभाविक देखील आहे. अगदी पहेलगाम सारखी अनपेक्षित घटना घडली तर तसं काही फार करता येत नाही, सरकारवरचा विश्वास देखील उडत नाही. परंतु नुकतीच महाराष्ट्र वीज मंडळाने जाहीर केलेला सौर ऊर्जेबाबतचा नियम म्हणजे अजबच म्हणायला हवा. थोडक्यात सांगायचं तर ज्या उद्देशाने मोठे उद्योजक किंवा लहान सहान कारखानदार बऱ्यापैकी गुंतवणूक करून ज्या आशेवर तो परतावा मिळण्याची अपेक्षा करत असतात त्यावरच घाला घातला गेलेला आहे.
एकच दणका
म्हणे, आता 24 तास सौरऊर्जेचा मोबदला म्हणून वीज मंडळाची वीज मिळणार नाही. याचा अर्थ असा की फक्त आठच तास त्या बदल्यात असलेली वीज मिळणार. उरलेले सोळा तास वीज मंडळाच्या राक्षसी दराने वीज खरेदी करावी लागणार. शिवाय जेव्हा कारखाना बंद असेल तेव्हा जी काही युनिट्स गोळा होत होती, त्याचा परतावा देखील मिळणे थोडे मुश्किल होऊन बसले आहे. एखादा सौरऊर्जा तज्ञ याबद्दल त्यांचे मत देईलच. परंतु या निमित्ताने सरकार हे देखील अत्यंत बे भरवशाचे आहे हे सिद्ध होऊ लागले आहे.
खाजगीत तर असे वरचेवर होत असते
मला आणि इतर अनेक लहान उद्योजकांना हा वारंवार अनुभव येत असतोच की काम संपलं की ज्या संस्थेंसोबत आपण काम सुरू केलं आहे किंवा होतं त्या आपल्याला वाऱ्यावर सोडतात. यात फार तपशीलात जाण्यात अर्थ नाही.
आज गुरुपौर्णिमा आणि त्या निमित्ताने अनुभव हा आपला कायमस्वरूपी गुरू तो आपल्याला काय शिकवतो हे अधिक महत्त्वाचं.
यातून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे की कुणीच विश्वासार्ह नाही ही वस्तुस्थिती स्वीकारणे. आणि उद्योजक हा प्रथम गुंतवणूकदार आहे ही अधिक व्यापक दृष्टी विकसित करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.
आपल्या व्यवसायाचा सुद्धा आपण अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय असाच विचार करायला हवा. आपण एकच व्यवसाय घेऊन बसतो आणि त्यात वर खाली झाले की दुःख करत बसतो. असे न करता आपण अनेक ठिकाणी आपली गुंतवणूक विखुरणे गरजेचे आहे. शेअर बाजार आपल्याला ही संधी देतोच. स्वतः अभ्यास करून हे करता येईलच, परंतु ह्या विचाराला केंद्रस्थानी धरून बाकीचे विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरेल.
म्हणजे करायचे काय ?
गुंतवणूक हा आपला स्थायीभाव ठेवला तर परतावा हा त्यातला परिणाम. कोणत्याही गोष्टींनी उमटणारे पडसाद हे काहींसाठी योग्य असतात तर काहींसाठी अयोग्य. शेअर बाजार आपल्याला अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये अगदी कमीत कमी गुंतवणूक करून आपली गुंतवणूक समतोल करण्याची बहुमूल्य संधी देतो. अनेक लोक हे एसआयपी किंवा थेट रोख्यांमध्ये गुंतवणे ह्या मार्गाने हे करतच असतात. गरज आहे ती या मार्गाकडे प्रमुख मार्ग म्हणून पाहण्याची.
जब जाग आए वही सवेरा
"माझं वय फार झालंय", किंवा
"मी अगदीच तरुण आहे",
"आत्ता कुठे करिअरला सुरुवात केली आहे",
तत्सम कारणे मनाला देत बसू नका. ज्या क्षणी हे उमगलय त्या क्षणी कामाला सुरुवात करा.
एखाद दोन पुस्तके वाचा, काही कोर्सेस वगैरे अटेंड करा. खूप पैसे भसकन गुंतवू नका. त्याऐवजी अशा कोर्सेस किंवा शिकण्यामध्ये थोडे जास्त पैसे गेले तरी चालेल. काही ठिकाणी खूप चांगले काही मिळेल, काही ठिकाणी तितकेसे मिळाले नाही असे देखील वाटेल. परंतु एकदम अंधविश्वासाने किंवा कमी ज्ञानाने हे सुरू करू नका.
यालाच आजपासून सुरुवात करूया.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.