अगदी ताजी ताजी घटना. जाता - येता मला कार्यालयाजवळ एक प्रिंटींग चे दुकान नजरेस पडले. त्यावेळी गडबडीत असल्याने मी लक्षात ठेवले आणि नंतर अनेक वेळा ते कुठे आहे ह्याचं शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मिळता मिळेना.
आपला सहज अग्रक्रम जवळ असेल त्याला असतो. आणि हे दुकान नक्की माझ्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरचे आहे आणि तेही कार्यालयाजवळ आहे इतके माझ्या पक्के लक्षात होते. त्यामुळे मला शेवटी एक दिवस हे सापडले.
त्यांना कार्ड दिले, त्यांचे काम समजून घेतले. त्यांना पुढे काम देईन - न देईन हा भाग अलाहिदा, पण तिथून निघता निघता एक गमतीदार घटना घडली, जी माझ्या पक्की लक्षात राहिली आणि विनोबा भावे ह्यांनी "गीता प्रवचने" मध्ये उल्लेख केलेलं एक वाक्य आठवलं. त्यांनी धुक्याचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात...
धुक्यात आपल्याला जवळचं दिसतच नाही
आणि दूरचं मात्र नीट दिसतं
झालं असं , की तिथून निघत असताना मी त्या दुकान मालकाशी बोललो ; त्यांना म्हणालो, कि तुमच्या shop वर बोर्ड नाही, मिळणार कसं ?
ह्यावर त्यांनी मला आवर्जून सांगितलं ( त्यांच्या दारावर लावलेल्या स्टीकर कडे अंगुलीनिर्देश करून ) कि गुगल वर हे नांव टाकलेत ना , तर लगेच मिळेल !
आता बोला.
आपले ग्राहक आपल्याला गुगल वर शोधत असतात हे खरेच, परंतु स्थानिक मंडळी ही आपली आपसूक ग्राहक असतात हो !