Thursday, 13 November 2025

तोच ( ग्राहक ) च नसेल, तर मी कुठून असणार !

​नेटवर्किंग मध्ये काम करत असताना कसे कसे अनुभव येत राहतात, जे शिक्षण म्हणून नाही घेतले ना, तर नक्की वैफल्य येईल. नुकताच आलेला एक अनुभव असा :

मला प्रवासाला जायचे होते. मी शक्यतो माझी हॉटेल खोली वगैरे माझी मीच पोर्टल वरून बुक करून जात असतो. गेल्या वेळी मला असे वाटले, की एखाद्या प्रवास यात्रेच्या सुविधा देणाऱ्या एखाद्या व्यावसायिक व्यक्तीमार्फत हे काम करावे. उद्देश असा की फक्त कमी पैशात सर्व काही असे न असता जरा ऐसपैस , तिथली रूम सेवा वगैरे बद्दल माहिती असलेल्या व्यक्तीने हे करून द्यावे. थोडे अधिक पैसे द्यायची माझी तयारी आहेच. सेवेला मोल असावेच. शिवाय बिझनेस नेटवर्क मधील मेंबर असल्याने जरा अधिक विश्वसार्हता वगैरे.

मी भरपूर वेळ हातात ठेवून वगैरे संपर्क केला, वेळोवेळी रिमाइंड केले. उत्तर “झालय हो, टेन्शन नका घेवू” हे पालुपद. शेवट अगदी प्रवासाच्या २-३ दिवस आधी १०० टक्के आगावू रक्कम भरून हॉटेल रूम बुक केली. दुर्दैवाने मी आजारी पडल्याने रद् लागणार असे दिसले. सदर व्यक्तीला हे सांगताच ताबडतोब उत्तर “पैसे परत मिळत नाहीत एक दिवस अगोदर रद्द केले तर” ! 

एकतर दोन दिवस होते हातात. किमान प्रयत्न करणे आणि त्याचे आश्वासन देणे तरी निश्चित शक्य होतच. 

फक्त हेच हिने केले नाही पण परस्पर मला न सांगता खात्यात refund जमा झाला. 

परिणाम महत्त्वाचा असला तरीही थोडा संवाद अपेक्षित आहे.

बाकी काही असो, पण मला का कायमच प्रश्न सतावत आलेला आहे … की आपण जे काम करत असतो ना, अगदी कोणतेही, ते कुणा तरी करिता असते नाही का ? 

म्हणजे असं… की तो जो … ज्याच्या करिता हा खटाटोप मांडलेला असतो, त्यालाच खोडून काढल्यासारखे झाले ना हे. तेही सेवा व्यवसाय ! Communication matters 

शिवाय, बिझनेस नेटवर्क, जिथे फक्त एकमेकांच्या ओळखींचा व्यापार असतो, तिथे तर हे फार घातक ठरू शकते, नाही का ?

पूर्वी माझे एक मशीनरी चे पुरवठादार होते. माझा व्यवसाय मार्केटिंग करून मागण्या मिळविणे व जी मंडळी ती मशीन्स तयार करतात त्यांच्याकडून तयार करून घेवून ती पुरवणे ह्या प्रकारचा होता. तर कधी कधी ह्या पुरवठा दारांकडून वेळोवेळी विविध मशिनरीची वेगवेगळ्या ( म्हणजे मशीन तेच असेल, परंतु समोरून त्या मशीनकडून ईप्सित कार्य बदलले की मॉडल मध्ये बारीक बदल होत असे. ) किंमतपत्रकांची गरज भासायची. त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडून ही किंमत पत्रके पुन्हा पुन्हा घेत असू. बरेच लोक द्यायचे सुद्धा. मान्य, की कधी कधी माझ्याकडून सुद्धा पूर्वी मागितलेले किंमतपत्रक पुन्हा मागविले गेले असावे. तरी मलाही भान होतेच की ! पण माझ्या ह्या मित्राने मात्र मला खणखणीत सांगून टाकले “आता ह्यापुढे मी तुम्हाला कोणतेही कोटेशन देणार नाही” 

एक दुसरा पुरवठादार होता, तो म्हणाला : “तुम्ही नुसतीच कोटेशन्स घेत राहता. ऑर्डर तर कधीच देत नाही !” 

ह्या दोघांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल मला नक्कीच आदर वाटतो. पण आपला धर्म , उदरनिर्वाह हा वेळ विकून होत नाही ( आपण नोकरदार नाही ). ह्या अर्थी आपण सांगत आहोत की “अमुक आमच्याकडे आहे , तर ते तुम्ही घ्या”. मग समोरून विचारणा होणार. तर ह्याच मूलभूत संकल्पनेला छेद दिल्यासारखं झालं ना हे. ह्या उलट एक व्यक्ती म्हणाली तीन वेळा नाही तीनशे वेळा विचारा सर. मी देतच राहीन. ह्या व्यक्तीशी पुढे घनिष्ठ मैत्री झाली. गुज्जू भाई. त्याचं म्हणणं : सुरुवातीला तुझ्याकडून जास्त प्रश्न येतील. हळूहळू कमी होतील.पण तू ट्रेन झालास की मला तुझ्याचकडून भरपूर धंदा येईल ना बाबा ! 


उगाच नाही लोक गुजराथी मंडळींकडून धंदा शिकत !

Saturday, 11 October 2025

उद्योगाचे पुढील पिढीत यशस्वी संक्रमण !

निवडक उद्यमी चे पूर्वापार सदस्य आहेत, त्यापैकी डॉ राजूरकर हे एक सदस्य. परभणी मध्ये त्यांचा L R Pharmaceuticals हा उद्योग गेली २५ वर्षे उभा आहे, आणि विशेष म्हणजे पुढच्या पिढीत आता संक्रमित देखील झालाय. नुकतीच निवडक उद्यमी च्या काही मंडळींनी त्यांच्या उद्योगास भेट दिली, त्याबद्दल वृत्तांत :-



निमित्त होते, निवडक च्या त्रैमासिक बैठका. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू. तर गेल्या महिनाभरापासून हे सुनियोजित आणि तरीही कोणत्याही प्रकारच्या ताणविरहित पार पडले. एकत्र प्रवास केल्याने संबंध, मैत्री अधिक घट्ट झाली. ३ तारखेला निघून ४ तारखेला परभणी ला पोचलो आणि पाठोपाठ L R Pharma येथे सकाळी आलो.



आधी एक सादरीकरण झाले. त्यात डॉक्टर स्वत: व सोबत त्यांचे दोन्ही चिरंजीव, स्नुषा तसेच तिसरी पिढी ( नातू ) ह्यांचाही सहभाग होता.











संध्याकाळी ( रात्री ) ऐसपैस निवांत क्षणांत गप्पा अधिक खुलल्या, रंगल्या. डॉ स्वत: Veternary Medicine ह्या क्षेत्रात अत्यंत सन्माननीय आहेतच, शिवाय जनावरांची आयुर्वेदिक औषधे ह्या क्षेत्रात बहुधा एकमेव असावेत. सरांचे अनेक प्रबंध, पुस्तके इत्यादी क्षेत्रात प्रचलित आहेत. 



त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून ज्येष्ठ चिरंजीव हा देखील "डॉक्टर सौरभ" आहे, जो आता कनिष्ठ चिरंजीव सिद्धांत, जो एका प्रथितयश संस्थेतून व्यवस्थापन शिकून तयार होवून आलाय. ह्या दोघांनी स्वेच्छेने कुटुंबाच्या उद्योगात प्रवेश केलाय, ढकललेले नाही, हे विशेष. स्नुषा कल्याणी ही कंपनीच्या उद्योगाचे दर्जा नियंत्रण पाहते, स्वत: उच्च विद्या विभूषित आहे, तर आता ही पिढी सध्याच्या उत्पादन कारखान्याव्यातिरिक्त आता अजून एक कारखाना अशी मोठी झेप घेत आहेत, सोबत एक अत्याधुनिक प्रयोगशाळा सेट अप असाही मोठ्ठा मानस आहे. 

दुसऱ्या दिवशी ह्याला जोडून निवडक ने थोडे पर्यटन केले :-




दुसऱ्या दिवशी सर्व सकाळी पुनश्च मुक्कामी आलो. आता पुढची त्रैमासिक भेट जानेवारीत असेल. ह्या भेटींचे कारण असे आहे, कि आपण एकमेकांचे संचालक मंडळ. तीन महिन्यांचा अहवाल आकड्यांच्या स्वरूपात सादर करायचा आणि अपेक्षित परिणाम साधायचा.

Thursday, 2 October 2025

संधी इथेच आहे !

निर्यात म्हणजे तसं पाहता काय असतं वेगळं ? इथे जवळ काही वस्तू पाठवायच्या ऐवजी लांब पाठवायची. लहान गोष्टी पाठवताना तर ही कटकटच वाटते,नाही का ? 

उदा. कुणी खाद्य पदार्थ तयार करतय तर लांब  म्हटलं की जरा जीवावरच येतं. 

इतकं आणि इतकंच साधं ठेवलं ना आपण, म्हणजे त्या so called "export" चा गरिमा काढून टाकला की मग आपण प्रत्यक्ष, सहज विचार करू लागतो, त्याला प्रवृत्त होतो.

उदा. नुकताच मी मध्यपूर्वेच्या देशांत जाऊन आलो. काही काम मिळाले होते. तर पाठोपाठ, सवयीने तिथेच पुढे काय संधी त्याकरता पुन्हा एक प्रदर्शन असेल त्याला जावे का, वगैरे महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात मन गुंतू लागलं. 


तरी पुढची कोणतीही पावले उचलण्या पूर्वी काही गोष्टी विचारत घेणे योग्य, जसे की 

जे काम तिकडे निर्यात करू पाहतोय,त्याला इथेच खूप मागणी आहे ना !
कधी तरी येणाऱ्या spikes वर संपूर्ण रणनीती आखणे पूर्ण चूक
तिथेही ( आखाती देशांत ) त्यांना scale up करणे ही मोठी समस्या भेडसावते, जी आपल्याकडे अजिबात नाहीये.
मान्य की आपल्याकडे जरा गोंधळ आहेत, पण त्यातच अमाप संधीही आहेत.

सरतेशेवटी एवढेच म्हणायचे आहे,की इथेच आपल्याला आपले काम देऊ करण्यासाठी वाव असेल, तर परदेशी काम करू नये असे नाही, पण वाट पहावी, रणनीती आपल्याच करता आखावी. 

सध्याच्या अमेरिकी आयातशुल्क प्रकरणाने अनेक दिग्गज मंडळींना जागेवर आणले असेलच !

Friday, 5 September 2025

GST शिथिलीकरण : एक धोरणात्मक पाऊल

आपले धोरण म्हणून जेव्हा काही कृती आपण करत जातो, तेव्हा आपोआपच येणाऱ्या संधीना सामोरे जाताना ताण न येता त्या हाताळल्या जातात. धोरणात्मक विकास, आपल्या व्यवसायाचा देखील, हा पायरी पायरीने होत जातो, आणि आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचत जातो, आणि हे सर्व अतिरिक्त ताण न येता होऊ लागतं.

नुकताच झालेला GST मधील बदल सुद्धा ह्याच परिप्येक्षातून पाहता येईल."आत्मनिर्भर भारत" ही भारताची अगदी प्रथमपासूनच भूमिका राहिली आहे. पूर्वीपासून ह्याच संकल्पनेचा नक्कीच आधार घेऊन ह्याकडे वाटचाल सुरू होती. त्यामुळेच २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या GST मध्ये काळानुरूप सुधारणा व सुसूत्रीकरण होणारच. गेल्या वर्षापासूनच अंतर्गत मागणी कमी होणे ही समस्या आपली अर्थव्यवस्था फेस करतच होती. त्यात अमेरिकेच्या तात्पुरत्या का होईना पण एकतर्फी आयात शुल्क प्रकरणामुळे ह्यात काहीतरी करणे भाग होते. गेल्या काही तिमाही ( ट्रम्प प्रकरणाच्या पूर्वी पासून ) सततचा कमी होणारा रेपो दर, MSME ना प्रेरक अशा कर्ज मोहिमा हेच सूचित करत आहेत. अमेरिकी नियमाने ह्याला एक निश्चित पाऊल, लगेच घ्यायला उद्युक्त केले.

पण आपण हे आधीपासूनच करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. कदाचित आपल्या देशाची वाढू लागलेली आर्थिक आणि एकंदरीत ताकद पाहून ट्रम्प महाशय व्यथित झाले आणि काहीतरी कारण काढून ह्या प्रति अमेरिका होऊ पाहणाऱ्या समीकरणांना आळा घालण्यासाठी त्यांनी फक्त भारतावर कडक निर्बंध लागू केलेत. 

आपल्या सरकारने चीन प्रमाणे कोणतीही आततायी कृती न करता, एक सुरक्षित अंतर ठेवून प्रतिसाद दिलाय. आणि आत्मनिर्भरते कडे अधिक जोमाने, आणि विश्वासाने आगेकूच सुरू केली आहे, आणि आपण हे सर्व करायला आधीपासून तयार आहोत. 

सोपे नसले,तरी अवघड नक्कीच नाही. आपल्या भारत देशाच्या आता पर्यंत असणाऱ्या सर्व नेत्यांचं असलेलं सामाजिक भान ह्याला ह्याचं सर्व श्रेय जातं. मुळात तीनशे चारशे वर्षा पूर्वी अस्तित्वात आलेल्या देशाची उथळ विचारसरणी विरुद्ध १.५ ते दोन हजार वर्षे नक्की इतिहास ठावूक असलेल्या एका उपखंडाची संस्कृती ही सर्व आव्हाने हाताळायला सज्ज आहेच.

हे सर्व वृथा अभिमान म्हणून प्रतिपादित होत नाहीये, पण वृथा भीती सुद्धा नको. आहोत आपण समर्थ, घेऊ सांभाळून !

Tuesday, 2 September 2025

अजून काय करायचं आता ?

नुकतेच आमच्या नेटवर्किंग ग्रुप वर सभासदांच्या अनुपस्थिती बाबत जोरदार चर्चा घडत आहे. अनेक कारणं असू शकतात त्याला, परंतु एक वस्तुस्थिती :- की बऱ्यापैकी पैसे भरून देखील अनेक सदस्य पुन्हा पुन्हा Meetings ना अनुपस्थित राहतात. 

ह्यातून काय दिसतं ? की ह्या मीटिंग ना न येण्याने आपण काहीही महत्त्वाचं मिस करतोय असं अनुपस्थितांना वाटत नाहीये. उलटपक्षी न जावून बराच वेळ वाया तरी जाणार नाही असं मात्र नक्की वाटतं आहे. कारण Meetings ना यायचं तर ३-४ तास, शिवाय जायचं यायचं ट्रॅफिक, त्यामुळे होणारी मचमच आणि लागणारे इंधन किंवा प्रवासभाडे. इतकं करून काहीतरी अतिशय बिघडत आहे असं त्यांना वाटत नाहीये. हे सत्य आहे, कारण ते घडत आहे, समोर.

ही परिस्थिती कोरड्या शिस्तीने किंवा नियमांनी नाही बदलायची

अमुक मीटिंग नंतर सदस्यत्व रद्द किंवा तुमच्याच सारखा व्यवसाय करणारा दुसरा व्यावसायिक घेऊ वगैरे शिस्त लावली तरीही फक्त हेच करून चालायचं नाही. उलट, मनाने ती अनुपस्थित व्यक्ती अजून दूर जाऊन प्रत्यक्ष ग्रुप मधून देखील बाहेर जाऊ शकेल. किंबहुना ही उत्तम संधी समजून त्यांच्याशी त्यांना काय मिळत नाहीय हे जर नीट, आस्थापूर्वक ऐकून व समजून घेतलं तर बदलाची शक्यता तरी आहे. ती व्यक्ती जरी नाही राहिली, तरीही भविष्यात सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत तरी ही दक्षता घेता येईल.

मग करायला काय हवं नक्की ?

एक तर स्वीकारायला हवं की प्रत्येकाला आपण समाधानी ठेवू शकणार नाही. त्यामुळे काही अनुपस्थिती दर ( २० टक्के पासून सुरुवात करू शकतो ) हा कायम राहणार.

दुसरं असं करायला हवं की प्रत्येक मेंबर शी कायम स्वरुपी संवाद रुपी सातत्यपूर्वक संपर्कात राहणाऱ्या दोन ते तीन व्यक्ती तैनात ठेवायला हव्या. ह्यांच्या मार्फत त्या त्या सदस्यांशी संवाद साधायचा. ह्या व्यक्ती "कुणीतरी" नसून नीट पाहून घ्याव्या. आपल्या फायद्याच्या, मर्जीतल्या नको. तर जुन्या, जाणत्या असाव्यात. 

आपल्याला ग्रुप फायदेशीर ठरतोय की नाही ह्याचे एक सोपे मानक म्हणजे आपला प्रत्यक्ष व्यवसाय वाढणे. आणि तो माझ्या ग्रुप मुळे वाढण्याची शक्यता आहे, मी शिस्तबद्ध प्रयत्न केल्यावर असे वाटणे आणि ते प्रत्येक मीटिंग गणिक वाढत जाणे. ग्रुप नेतृत्वाला हे उद्दिष्ट प्राप्त करणे तितकेसे अवघड नाही. कारण समजदार उद्योजक ठराविक कालावधीने एकत्र भेटतात, त्यामुळे त्यांची तशी समजूत चांगली आहे. 

हवा तो फक्त एक कटिबद्ध, लांब पल्ल्याचा कार्यक्रम, त्यात फक्त visitor Day म्हणजे ग्रुप चे सदस्य वाढविण्याची मोहीम किंवा सोशल ( एकत्र casual जमून वेळ घालवणे ) हे हवेच, शिवाय संपूर्ण नेटवर्क चे कार्यक्रम, इतर ठिकाणी भेटीगाठी, प्रशिक्षणे इत्यादींचा देखील अंतर्भाव असावा. ह्याचे वेळापत्रक असावे, बजेट हवे आणि अत्यंत गांभीर्याने अंमलबजावणी हवी. प्रत्येक मीटिंग मध्ये असे काही हवे ज्यातून अगदी अपूर्व नाही, तरी असे काही सत्र हवे, ज्यात काहीतरी अत्यंत नवीन अपडेट मिळतोय. संधी प्राप्त होतीय, जी न गेल्याने मी मिस करेन.

ह्यासाठी 

"अजून काय करायचं आता ?"
ऐवजी 
"अजून काय करता येईल ?" 

असा दृष्टीकोन हवा.





Sunday, 31 August 2025

त्या tariff चं काय इतकं!

सध्या गाजत असलेल्या ट्रम्प ने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्क ह्या विषयावर माझ्या निकटवर्ती व्यक्तीने टाकलेला हा खडा सवाल. प्रत्युत्तरार्थ माझं जागतिक घडामोडी इत्यादी  भाष्य. 

समांतरपणे आणि सहजच ह्याबद्दल सध्या बरंच लिहून किंवा आंतरजालावर देखील सातत्याने काही ना काही येतंय. भारताने हे संकट हलक्यात घेऊ नये, आणि त्याच वेळी घेऊ पेलून अशी देखील एक मानसिकता.

दरम्यान मनात चाललेल्या घडामोडी. समांतर पुस्तके वाचन आणि सोबत असलेली माहिती. तर मुळात "निर्यात" प्रकाराशी हे सारं संबंधित आहे. भीती ह्याचीच आहे. अमेरिकेची  आपल्याकडून होणारी आयात जिच्यावर एकदम ५० टक्के शुल्क लागू झाले आहे,त्यामुळे अमेरिकन मंडळी भारतीय वस्तू इतक्या वाढीव दराने घेणार नाहीत. परिणामस्वरूप ह्या वस्तू,सेवा ह्यांचे निर्माते आणि त्यात गुंतलेले सर्व हे अडचणीत आलेत.

आपल्याच प्रमाणे चीन, ब्राझील ह्याचीही ५० टक्के नाही, पण कोंडी झालीच आहे. चीन कडे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे अमेरिकेला थेट कोंडी होतेय,त्यामुळे त्यांच्यावर संक्रांत नाही. आपल्याकडे मात्र असं काहीच नाही की ज्यावर अमेरिकन "फक्त भारत" स्वरूपात अवलंबून रहावेत.

बाळबोध वाटेल, पण खरंच आपल्याला इतक्या निर्यातीची गरज आहे का ? अर्थशास्त्रज्ञ माझ्यावर तुटून पडतील, balance of trade कळत नाही का वगैरे म्हणतील, तरी.....

इसवीसनाच्या सुरुवाती पासून इतिहास पाहिलत तर भारतात विविध संसाधनांची असलेली विपुलता हाच येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा केंद्रबिंदू होता. प्रत्येक काळात,जोपर्यंत मुघल शाही आणि पाठोपाठ इंग्रजशाही आपल्याकडे एकछत्री सत्ता स्थिरावलेली नव्हती,तोपर्यंत तसा स्थिर व्यापार चालत असे आणि त्यातही वरदहस्त हा भारतीय उपखंडातील व्यापाऱ्यांकडे होता. 

आजही आपल्याला लाभलेले कृषिवैभव आपल्या लक्षात येत नाही. आणि जोडीने हिमालयातून वितळणाऱ्या नद्या. कोहिनूर सिंहासन पळवून नेले असेल,पण हे सर्व कुठे जाणार.

तर इंग्रजांच्या निमित्ताने ह्या विखुरलेल्या अनेक स्वराज्य संस्थांना एक भारत रुपी एकसंध देश मिळाला. आता गरज आहे फक्त आपली शक्तिस्थाने जाणून घ्यायची..

Thursday, 28 August 2025

मुरलेला गुंतवणूकदार

आमच्या निवडक उद्यमी च्या त्रैमासिक भेटी होत असतात. त्यात व्यावसायिक वाटचालीचा आढावा घेणे व सोबत एखाद्या वेगळ्या वाटेने विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत गप्पा असा अजेंडा असतो. गेल्या म्हणजे जुलै च्या भेटीत अमित हळबे ह्या उद्योजक - गुंतवणूकदार व्यक्तीशी गप्पा मारण्याचा योग आला, त्याबद्दल थोडे :-

अभियांत्रिकी शिक्षण घेत असल्यापासूनच अमित च्या डोक्यात गुंतवणूक विषयी कुतूहल होतेच. शिवाय व्यवसाय तर करायचा होताच. ह्या दोन्हीची समांतर वाटचाल करत अमित ने केलेली वाटचाल नक्की प्रेरक ठरेल. त्यातील काही ठळक मुद्दे इथे देतोय :-

# पहिला व्यवसाय कर्जाऊ पैशाने किंवा "फंडिंग" पद्धतीने करू नये. हळूहळू सुरुवात करावी. एकदा पाय जमले की पुढे whole वावर is our. अमित ने कायम क्रिकेट ची रूपके वापरून विचार मांडलेत.

# ज्यांचे आपण काम करतो त्यांचे ग्राहक शक्यतो विखुरलेले असावेत. हा सिद्धांत स्वतः च्या अडचणीत आलेल्या केटरिंग व्यवसायावरून आलाय. हाच गुंतवणुकीत देखील योग्य ठरेल.

# एकदा आपल्या व्यवसायाचे गणित पचनी पडले,की त्यातून मिळणारा नियमित पैसा, हा ठराविक अंतराळाने शेअर मार्केट मध्ये लावावा. म्युच्युअल फंड मध्ये गुंतविताना index प्रकारच्या फंड मध्ये लावावेत. जास्त काळ गुंतवणूक ही १२ ते १५ टक्के वाढ देतेच.

# स्वतः च्या सोबत इतर व्यवसायात पैसे गुंतवणे हिताचे ठरेलच.तेही करिअर च्या सुरुवातीपासून करायला हवे.निवडताना,ज्यांचा व्यवसाय सहज समजेल अशांची निवड करावी. घाईत निर्णय अजिबात नको.

# शेवटी यशाचं मानक आपली विक्री तसेच भरघोस वाढ हेच असते. हे साध्य करता येईल ते भौगोलिक किंवा निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहक समूहांना निशाण करून. ह्यात अमित ने टाटा समूहाची दोन उदाहरणे दिली. ताज हे उच्च उत्पन्न गटासाठी तर जिंजर हे मध्यम गटासाठी. असेच वस्त्रोद्योगत West Side सोबत Zudio हा ब्रँड टाटा समूहाने आणला.

सर्वच्या सर्व मुद्दे इथे देणे प्रस्तुत नाही, कारण निवडक च्या त्रैमासिक भेटींतून अशा वेगळ्या विचाराच्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणे व त्यातून ग्रहण केलेलं ज्ञान अंमलात आणणे ह्यावर भर आहे.

अमित हळबे ह्यांचे मन:पूर्वक धन्यवाद.