Thursday, 2 October 2025

संधी इथेच आहे !

निर्यात म्हणजे तसं पाहता काय असतं वेगळं ? इथे जवळ काही वस्तू पाठवायच्या ऐवजी लांब पाठवायची. लहान गोष्टी पाठवताना तर ही कटकटच वाटते,नाही का ? 

उदा. कुणी खाद्य पदार्थ तयार करतय तर लांब  म्हटलं की जरा जीवावरच येतं. 

इतकं आणि इतकंच साधं ठेवलं ना आपण, म्हणजे त्या so called "export" चा गरिमा काढून टाकला की मग आपण प्रत्यक्ष, सहज विचार करू लागतो, त्याला प्रवृत्त होतो.

उदा. नुकताच मी मध्यपूर्वेच्या देशांत जाऊन आलो. काही काम मिळाले होते. तर पाठोपाठ, सवयीने तिथेच पुढे काय संधी त्याकरता पुन्हा एक प्रदर्शन असेल त्याला जावे का, वगैरे महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात मन गुंतू लागलं. 


तरी पुढची कोणतीही पावले उचलण्या पूर्वी काही गोष्टी विचारत घेणे योग्य, जसे की 

जे काम तिकडे निर्यात करू पाहतोय,त्याला इथेच खूप मागणी आहे ना !
कधी तरी येणाऱ्या spikes वर संपूर्ण रणनीती आखणे पूर्ण चूक
तिथेही ( आखाती देशांत ) त्यांना scale up करणे ही मोठी समस्या भेडसावते, जी आपल्याकडे अजिबात नाहीये.
मान्य की आपल्याकडे जरा गोंधळ आहेत, पण त्यातच अमाप संधीही आहेत.

सरतेशेवटी एवढेच म्हणायचे आहे,की इथेच आपल्याला आपले काम देऊ करण्यासाठी वाव असेल, तर परदेशी काम करू नये असे नाही, पण वाट पहावी, रणनीती आपल्याच करता आखावी. 

सध्याच्या अमेरिकी आयातशुल्क प्रकरणाने अनेक दिग्गज मंडळींना जागेवर आणले असेलच !

Friday, 5 September 2025

GST शिथिलीकरण : एक धोरणात्मक पाऊल

आपले धोरण म्हणून जेव्हा काही कृती आपण करत जातो, तेव्हा आपोआपच येणाऱ्या संधीना सामोरे जाताना ताण न येता त्या हाताळल्या जातात. धोरणात्मक विकास, आपल्या व्यवसायाचा देखील, हा पायरी पायरीने होत जातो, आणि आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचत जातो, आणि हे सर्व अतिरिक्त ताण न येता होऊ लागतं.

नुकताच झालेला GST मधील बदल सुद्धा ह्याच परिप्येक्षातून पाहता येईल."आत्मनिर्भर भारत" ही भारताची अगदी प्रथमपासूनच भूमिका राहिली आहे. पूर्वीपासून ह्याच संकल्पनेचा नक्कीच आधार घेऊन ह्याकडे वाटचाल सुरू होती. त्यामुळेच २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या GST मध्ये काळानुरूप सुधारणा व सुसूत्रीकरण होणारच. गेल्या वर्षापासूनच अंतर्गत मागणी कमी होणे ही समस्या आपली अर्थव्यवस्था फेस करतच होती. त्यात अमेरिकेच्या तात्पुरत्या का होईना पण एकतर्फी आयात शुल्क प्रकरणामुळे ह्यात काहीतरी करणे भाग होते. गेल्या काही तिमाही ( ट्रम्प प्रकरणाच्या पूर्वी पासून ) सततचा कमी होणारा रेपो दर, MSME ना प्रेरक अशा कर्ज मोहिमा हेच सूचित करत आहेत. अमेरिकी नियमाने ह्याला एक निश्चित पाऊल, लगेच घ्यायला उद्युक्त केले.

पण आपण हे आधीपासूनच करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. कदाचित आपल्या देशाची वाढू लागलेली आर्थिक आणि एकंदरीत ताकद पाहून ट्रम्प महाशय व्यथित झाले आणि काहीतरी कारण काढून ह्या प्रति अमेरिका होऊ पाहणाऱ्या समीकरणांना आळा घालण्यासाठी त्यांनी फक्त भारतावर कडक निर्बंध लागू केलेत. 

आपल्या सरकारने चीन प्रमाणे कोणतीही आततायी कृती न करता, एक सुरक्षित अंतर ठेवून प्रतिसाद दिलाय. आणि आत्मनिर्भरते कडे अधिक जोमाने, आणि विश्वासाने आगेकूच सुरू केली आहे, आणि आपण हे सर्व करायला आधीपासून तयार आहोत. 

सोपे नसले,तरी अवघड नक्कीच नाही. आपल्या भारत देशाच्या आता पर्यंत असणाऱ्या सर्व नेत्यांचं असलेलं सामाजिक भान ह्याला ह्याचं सर्व श्रेय जातं. मुळात तीनशे चारशे वर्षा पूर्वी अस्तित्वात आलेल्या देशाची उथळ विचारसरणी विरुद्ध १.५ ते दोन हजार वर्षे नक्की इतिहास ठावूक असलेल्या एका उपखंडाची संस्कृती ही सर्व आव्हाने हाताळायला सज्ज आहेच.

हे सर्व वृथा अभिमान म्हणून प्रतिपादित होत नाहीये, पण वृथा भीती सुद्धा नको. आहोत आपण समर्थ, घेऊ सांभाळून !

Tuesday, 2 September 2025

अजून काय करायचं आता ?

नुकतेच आमच्या नेटवर्किंग ग्रुप वर सभासदांच्या अनुपस्थिती बाबत जोरदार चर्चा घडत आहे. अनेक कारणं असू शकतात त्याला, परंतु एक वस्तुस्थिती :- की बऱ्यापैकी पैसे भरून देखील अनेक सदस्य पुन्हा पुन्हा Meetings ना अनुपस्थित राहतात. 

ह्यातून काय दिसतं ? की ह्या मीटिंग ना न येण्याने आपण काहीही महत्त्वाचं मिस करतोय असं अनुपस्थितांना वाटत नाहीये. उलटपक्षी न जावून बराच वेळ वाया तरी जाणार नाही असं मात्र नक्की वाटतं आहे. कारण Meetings ना यायचं तर ३-४ तास, शिवाय जायचं यायचं ट्रॅफिक, त्यामुळे होणारी मचमच आणि लागणारे इंधन किंवा प्रवासभाडे. इतकं करून काहीतरी अतिशय बिघडत आहे असं त्यांना वाटत नाहीये. हे सत्य आहे, कारण ते घडत आहे, समोर.

ही परिस्थिती कोरड्या शिस्तीने किंवा नियमांनी नाही बदलायची

अमुक मीटिंग नंतर सदस्यत्व रद्द किंवा तुमच्याच सारखा व्यवसाय करणारा दुसरा व्यावसायिक घेऊ वगैरे शिस्त लावली तरीही फक्त हेच करून चालायचं नाही. उलट, मनाने ती अनुपस्थित व्यक्ती अजून दूर जाऊन प्रत्यक्ष ग्रुप मधून देखील बाहेर जाऊ शकेल. किंबहुना ही उत्तम संधी समजून त्यांच्याशी त्यांना काय मिळत नाहीय हे जर नीट, आस्थापूर्वक ऐकून व समजून घेतलं तर बदलाची शक्यता तरी आहे. ती व्यक्ती जरी नाही राहिली, तरीही भविष्यात सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत तरी ही दक्षता घेता येईल.

मग करायला काय हवं नक्की ?

एक तर स्वीकारायला हवं की प्रत्येकाला आपण समाधानी ठेवू शकणार नाही. त्यामुळे काही अनुपस्थिती दर ( २० टक्के पासून सुरुवात करू शकतो ) हा कायम राहणार.

दुसरं असं करायला हवं की प्रत्येक मेंबर शी कायम स्वरुपी संवाद रुपी सातत्यपूर्वक संपर्कात राहणाऱ्या दोन ते तीन व्यक्ती तैनात ठेवायला हव्या. ह्यांच्या मार्फत त्या त्या सदस्यांशी संवाद साधायचा. ह्या व्यक्ती "कुणीतरी" नसून नीट पाहून घ्याव्या. आपल्या फायद्याच्या, मर्जीतल्या नको. तर जुन्या, जाणत्या असाव्यात. 

आपल्याला ग्रुप फायदेशीर ठरतोय की नाही ह्याचे एक सोपे मानक म्हणजे आपला प्रत्यक्ष व्यवसाय वाढणे. आणि तो माझ्या ग्रुप मुळे वाढण्याची शक्यता आहे, मी शिस्तबद्ध प्रयत्न केल्यावर असे वाटणे आणि ते प्रत्येक मीटिंग गणिक वाढत जाणे. ग्रुप नेतृत्वाला हे उद्दिष्ट प्राप्त करणे तितकेसे अवघड नाही. कारण समजदार उद्योजक ठराविक कालावधीने एकत्र भेटतात, त्यामुळे त्यांची तशी समजूत चांगली आहे. 

हवा तो फक्त एक कटिबद्ध, लांब पल्ल्याचा कार्यक्रम, त्यात फक्त visitor Day म्हणजे ग्रुप चे सदस्य वाढविण्याची मोहीम किंवा सोशल ( एकत्र casual जमून वेळ घालवणे ) हे हवेच, शिवाय संपूर्ण नेटवर्क चे कार्यक्रम, इतर ठिकाणी भेटीगाठी, प्रशिक्षणे इत्यादींचा देखील अंतर्भाव असावा. ह्याचे वेळापत्रक असावे, बजेट हवे आणि अत्यंत गांभीर्याने अंमलबजावणी हवी. प्रत्येक मीटिंग मध्ये असे काही हवे ज्यातून अगदी अपूर्व नाही, तरी असे काही सत्र हवे, ज्यात काहीतरी अत्यंत नवीन अपडेट मिळतोय. संधी प्राप्त होतीय, जी न गेल्याने मी मिस करेन.

ह्यासाठी 

"अजून काय करायचं आता ?"
ऐवजी 
"अजून काय करता येईल ?" 

असा दृष्टीकोन हवा.





Sunday, 31 August 2025

त्या tariff चं काय इतकं!

सध्या गाजत असलेल्या ट्रम्प ने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्क ह्या विषयावर माझ्या निकटवर्ती व्यक्तीने टाकलेला हा खडा सवाल. प्रत्युत्तरार्थ माझं जागतिक घडामोडी इत्यादी  भाष्य. 

समांतरपणे आणि सहजच ह्याबद्दल सध्या बरंच लिहून किंवा आंतरजालावर देखील सातत्याने काही ना काही येतंय. भारताने हे संकट हलक्यात घेऊ नये, आणि त्याच वेळी घेऊ पेलून अशी देखील एक मानसिकता.

दरम्यान मनात चाललेल्या घडामोडी. समांतर पुस्तके वाचन आणि सोबत असलेली माहिती. तर मुळात "निर्यात" प्रकाराशी हे सारं संबंधित आहे. भीती ह्याचीच आहे. अमेरिकेची  आपल्याकडून होणारी आयात जिच्यावर एकदम ५० टक्के शुल्क लागू झाले आहे,त्यामुळे अमेरिकन मंडळी भारतीय वस्तू इतक्या वाढीव दराने घेणार नाहीत. परिणामस्वरूप ह्या वस्तू,सेवा ह्यांचे निर्माते आणि त्यात गुंतलेले सर्व हे अडचणीत आलेत.

आपल्याच प्रमाणे चीन, ब्राझील ह्याचीही ५० टक्के नाही, पण कोंडी झालीच आहे. चीन कडे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे अमेरिकेला थेट कोंडी होतेय,त्यामुळे त्यांच्यावर संक्रांत नाही. आपल्याकडे मात्र असं काहीच नाही की ज्यावर अमेरिकन "फक्त भारत" स्वरूपात अवलंबून रहावेत.

बाळबोध वाटेल, पण खरंच आपल्याला इतक्या निर्यातीची गरज आहे का ? अर्थशास्त्रज्ञ माझ्यावर तुटून पडतील, balance of trade कळत नाही का वगैरे म्हणतील, तरी.....

इसवीसनाच्या सुरुवाती पासून इतिहास पाहिलत तर भारतात विविध संसाधनांची असलेली विपुलता हाच येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा केंद्रबिंदू होता. प्रत्येक काळात,जोपर्यंत मुघल शाही आणि पाठोपाठ इंग्रजशाही आपल्याकडे एकछत्री सत्ता स्थिरावलेली नव्हती,तोपर्यंत तसा स्थिर व्यापार चालत असे आणि त्यातही वरदहस्त हा भारतीय उपखंडातील व्यापाऱ्यांकडे होता. 

आजही आपल्याला लाभलेले कृषिवैभव आपल्या लक्षात येत नाही. आणि जोडीने हिमालयातून वितळणाऱ्या नद्या. कोहिनूर सिंहासन पळवून नेले असेल,पण हे सर्व कुठे जाणार.

तर इंग्रजांच्या निमित्ताने ह्या विखुरलेल्या अनेक स्वराज्य संस्थांना एक भारत रुपी एकसंध देश मिळाला. आता गरज आहे फक्त आपली शक्तिस्थाने जाणून घ्यायची..

Thursday, 28 August 2025

मुरलेला गुंतवणूकदार

आमच्या निवडक उद्यमी च्या त्रैमासिक भेटी होत असतात. त्यात व्यावसायिक वाटचालीचा आढावा घेणे व सोबत एखाद्या वेगळ्या वाटेने विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत गप्पा असा अजेंडा असतो. गेल्या म्हणजे जुलै च्या भेटीत अमित हळबे ह्या उद्योजक - गुंतवणूकदार व्यक्तीशी गप्पा मारण्याचा योग आला, त्याबद्दल थोडे :-

अभियांत्रिकी शिक्षण घेत असल्यापासूनच अमित च्या डोक्यात गुंतवणूक विषयी कुतूहल होतेच. शिवाय व्यवसाय तर करायचा होताच. ह्या दोन्हीची समांतर वाटचाल करत अमित ने केलेली वाटचाल नक्की प्रेरक ठरेल. त्यातील काही ठळक मुद्दे इथे देतोय :-

# पहिला व्यवसाय कर्जाऊ पैशाने किंवा "फंडिंग" पद्धतीने करू नये. हळूहळू सुरुवात करावी. एकदा पाय जमले की पुढे whole वावर is our. अमित ने कायम क्रिकेट ची रूपके वापरून विचार मांडलेत.

# ज्यांचे आपण काम करतो त्यांचे ग्राहक शक्यतो विखुरलेले असावेत. हा सिद्धांत स्वतः च्या अडचणीत आलेल्या केटरिंग व्यवसायावरून आलाय. हाच गुंतवणुकीत देखील योग्य ठरेल.

# एकदा आपल्या व्यवसायाचे गणित पचनी पडले,की त्यातून मिळणारा नियमित पैसा, हा ठराविक अंतराळाने शेअर मार्केट मध्ये लावावा. म्युच्युअल फंड मध्ये गुंतविताना index प्रकारच्या फंड मध्ये लावावेत. जास्त काळ गुंतवणूक ही १२ ते १५ टक्के वाढ देतेच.

# स्वतः च्या सोबत इतर व्यवसायात पैसे गुंतवणे हिताचे ठरेलच.तेही करिअर च्या सुरुवातीपासून करायला हवे.निवडताना,ज्यांचा व्यवसाय सहज समजेल अशांची निवड करावी. घाईत निर्णय अजिबात नको.

# शेवटी यशाचं मानक आपली विक्री तसेच भरघोस वाढ हेच असते. हे साध्य करता येईल ते भौगोलिक किंवा निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहक समूहांना निशाण करून. ह्यात अमित ने टाटा समूहाची दोन उदाहरणे दिली. ताज हे उच्च उत्पन्न गटासाठी तर जिंजर हे मध्यम गटासाठी. असेच वस्त्रोद्योगत West Side सोबत Zudio हा ब्रँड टाटा समूहाने आणला.

सर्वच्या सर्व मुद्दे इथे देणे प्रस्तुत नाही, कारण निवडक च्या त्रैमासिक भेटींतून अशा वेगळ्या विचाराच्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणे व त्यातून ग्रहण केलेलं ज्ञान अंमलात आणणे ह्यावर भर आहे.

अमित हळबे ह्यांचे मन:पूर्वक धन्यवाद.


Tuesday, 26 August 2025

स्वधर्माचे महत्त्व

सरकारने पैसे लावून ऑनलाईन गेमिंग व्यवसायावर बंदी आणली आहे. परिणामस्वरूपी ७० हजार डॉलर ची dream eleven नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. बायजू तसेच सहारा इंडिया ह्यांसारख्या कंपन्यांनी प्रत्यक्ष उत्पादने भक्कम करण्या ऐवजी अल्पावधीत लोकप्रिय होत चाललेल्या टी 20 क्रिकेट करिता BCCI ला प्रायोजक राहून मोठा ग्राहकवर्ग ओढला. मुळात ह्या कंपनीचे व्यवसाय प्रारूप काय तर ग्राहकाला नादाला लावणे. हे कधीतरी गोत्यात येणारच होते. आले. इतकेच. 

थोड्याफार फरकाने युट्यूबर किंवा इंस्टाग्राम वरून कंटेंट क्रिएटर्स हा जो एक नव उद्योग म्हणून उदयास येतोय, त्याचीही वेगळी कथा नाही. आपले मूळ काम काय, आणि आपण काय प्रकारचं साहित्य निर्माण करत आहोत ह्याचं भान ह्या मंडळींना कधीच अस्वस्थ करत नाही. कारण त्यातून मिळणाऱ्या ( किंवा भासमान ) आर्थलाभाला दिलेले निव्वळ महत्त्व. माझ्या समोर दोन उदाहरणे आहेत :- 

एक आमचा कुटुंबाचा मित्र ज्याचे कला शाखेतील सर्वोच्च विद्यालयात शिक्षण झाले आहे, आणि त्याला त्यात खूप उत्कृष्ट असे प्रावीण्य लाभले आहे. ज्याने हा मार्ग स्वीकारला आहे,आणि तो आज खूपच जास्त पैसे मिळवीत आहे,आणि राहिलही. तो जो काही आशय पोस्ट करत असतो,त्याचा आणि त्याच्या मूळ प्रावीण्य असलेल्या विषयाशी काहीच संबंध सापडत नाही. बर जो आशय तो पोस्ट करतो,त्यानेही प्रेक्षक वर्गाच्या आयुष्यात काही गुणात्मक बदल घडत असेल असे वाटत नाही.

दुसरे उदाहरण माझे स्वतः चेच. अनेक वर्षे माझ्या water बिझनेस बद्दल मी व्हिडिओज करत आहे. Youtube वर पोस्ट देखील करत आहे. बऱ्यापैकी subscriber आहेत. सोबत इंस्टाग्राम वर सुद्धा मी हल्ली हल्लीच काही कंटेंट पोस्ट केला आहे. काही पाण्याविषयक मूलभूत संकल्पना समजावून सांगण्यासाठी. अचानक एका व्हिडिओ ला प्रमाणाबाहेर लोकप्रियता मिळाली. ह्याचे कारण काहीच नाहीये. तर ह्याच्या नादाला लागून मी व्यावसायिक आणि अधिक असेच व्हिडिओ तयार करणे, दर आठवड्याला दोन व्हिडीओ टाकणं वगैरे म्हणजे परत मूळ उद्देशापासून फारकत. मुळात आठवड्याला दोन असे काही असायला तर हवं. त्यामुळे ह्या नादाला मी फार लागत नाहीये.

फरक आहे तो स्वधर्म निवडायचा

स्वधर्म म्हणजे सहज धर्म. माझे व्यावसायिक काम काय ? तर लोकांनी व्यवसायात, (त्यात water business हा एक), येणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देताना सतत आर्थिक फलकाकडे लक्ष ठेवून मार्गक्रमण करावे ह्या करिता नियमित काळाने त्यांच्यासोबत केलेले त्रयस्थ अवलोकन व सुधारणा. 

माझ्या स्वतः बाबतच मी हे करत आलोय, हे माझे qualification. हा सहज होणारा धर्म. स्वधर्म. 

ह्याचे स्मरण, भान ठेवले तर माझ्याकडून इतर कृती होणारच नाही. ती मिळणाऱ्या संपत्ती किंवा लोकमान्यते पेक्षाही जास्त महत्त्वाची आहे, कारण हे काम मी अगदी शारीरिक दृष्ट्या पूर्ण हतबल होई पर्यंत निश्चित, सहज करू शकतो.

तर व्यापक प्रमाणावर पाहता तर ह्या कंपनीचे उच्च उद्दिष्ट नाही की ज्या कामाबद्दल काहीही अभिमान असावा. त्यामुळे स्वधर्माचा पत्ताच नाही. स्पिरिचुअल नाही आहे हे प्रतिपादन. इसमें समझदारी भी हैं 

Monday, 25 August 2025

निव्वळ नव्हे, कार्यचालन नफा महत्त्वाचा


पूर्वी आम्ही निवडक उद्यमी च्या  पॉडकास्ट मध्ये एक विषय घेतला होता, त्याचा मतितार्थ असा होता, की आकर्षक मथळ्याने होणारी दिशाभूल.

असेच आहे हे. बऱ्याच कंपन्या आपले ताळेबंद किंवा त्रैमासिक निकाल जाहीर करतात तेव्हा नेट प्रॉफिट अर्थात निव्वळ नफा ह्याकडे लक्ष वेधून घेतात. ह्यात किती वाढ झाली हे दर्शविण्यात येतं. खरं पाहता जे लांबाजी म्हणत आहेत त्याप्रमाणे खरेच हा वाढविणे तसे कमी कष्टाचे असते. कारण ह्यासाठी बहुतेक वेळा कागदावरच फेरबदल करावे लागतात. उदा. निव्वळ नफा वाढवताना प्रत्यक्ष व्यवसाय सोडून गुंतवणूक मार्गाने मिळविलेला काही नफा असू शकतो, किंवा एखादी जुनी मालमत्ता विकून मिळविलेला पैसा असू शकतो. परंतु operating profit किंवा परिचालीत नफा वाढविणे खूप कष्टाचे असते. ह्यात प्रत्यक्ष कार्यपद्धती, मानसिकता, प्रत्यक्ष कारखान्यातील किंवा कार्यपद्धतीत काही बदल घडवून आणावे लागतात वगैरे. हे इतके सहज नाही आणि सोपेही नाही. म्हणून तर EBITDA ह्या मानकास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

काय असतो EBITDA ?

EBITDA म्हणजे 
EARNINGS ( उत्पन्न )
BEFORE ( पूर्वी ) 
INTEREST ( व्याज )
TAXES ( कर )
DEPRECIATION ( घसारा )
AMMORTISATION ( बौद्धिक संपदा किंवा मालमत्तेवर मिळणारा घसारा )

साध्या भाषेत GROSS PROFIT म्हणजे ठोक नफा ( विक्री - खरेदी ) मधून इतर खर्च जसे की कार्यालयीन खर्च किंवा विक्री खर्च इत्यादी म्हणजे जे जे खर्च एखादी ऑर्डर पूर्ण करायला लागतात ते ते सर्व खर्च वजा करून राहिलेली रक्कम म्हणजे हा EBITDA

कसलेले गुंतवणूकदार ह्या मानकाचा खूप उपयोग करत असतात. ते कदाचित तुमच्या माझ्याच सारखे लहान रक्कम गुंतविणारे देखील असूच शकतात की !

कंपनीची आर्थिक परिपत्रके वाचण्याचा सराव करत गेला की हे साध्य व्हायला लागतं आणि स्वतः च्या तसेच इतर कुणाच्या समस्येतही मार्ग दाखवायला उपयोगी पडू शकतं.

कालचेच उदाहरण

कालच माझे एक जुने स्नेही व्यावसायिक भेटले होते आणि शेअर करत होते, अत्यंत अभिमानाने, की कसे त्याचे लोक जोडण्याचे कौशल्य भारी आहे. असेलही. ह्याचे द्योतक म्हणून त्यांनी त्यांच्या प्रमुख व्यवसायाशिवाय इतर उपयुक्त व्यक्तींशी कसे जुगाड साधून व्यावसायिक उन्नती साधली आहे. काही वर्षे ही युती उत्तम चालेल. ह्यातून त्यांचा non operating income वाढतोय. हा त्यांचा investment Cash Flow आहे. हरकत नाही. फक्त चूक अशी आहे, की त्यात प्रत्येक प्रारुपात त्यांनी भागीदार घेताना त्यांना टक्के देऊन ठेवले आहे. प्रत्येक युतीची मालकी स्वतः कडेच ठेवली आहे. ह्यात धोका असा आहे की कोणतेही आर्थिक संकट आले किंवा कोणतेही कायद्याने गुन्ह्याचे आरोप आले तर हाच बाबा जबाबदार.

ही व्यक्ती मला निव्वळ नफा दाखवत होती, ज्यात त्यांच्या प्रत्यक्ष धंद्याचा फक्त अर्धाच हिस्सा होता, त्यातही सरकारी जुगाडे हेच प्रमुख माध्यम दिसत होते.अर्थात हा भाग वेगळा. पण ह्यांचा EBITDA आकर्षक नाही हे त्यांच्या व्यवसायात मी गुंतवणूक न करायला उत्तम कारण ठरले.

बर, बाबाजी कारण समजून घ्यायला तयारच नाहीत. जाता जाता मला "मी काही हिंमत हरणार नाही" स्वरूपाचा डायलॉग मारून मला हिणवून वगैरे निघून गेले. ही एक गंमत.

अजून एक गोष्ट म्हणजे हा कार्यचालन नफा सुधारणे ह्या एकमेव उद्दिष्टासाठी मी माझ्या ग्राहकासोबत अक्षरशः झगडतोय. सर्वात जास्त त्रास होतोय तो त्यांची मानसिकता बदलण्यात.